धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
पुणे : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत इतिहास संशोधन मंडळ येथे भीमाशंकर परिसरातील अतिदुर्गम भागातील ग्रामीण, आदिवासी आणि कातकरी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य व शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. बालसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त पराग ठाकूर तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेवक कुणाल टिळक, नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, ॲड. गणेश सातपुते, ॲड. अरुण लंबुगोळ, श्रीरंग कला दर्पणचे अक्षय शहापूरकर, उद्योजक संदीपजी शहा, दादासाहेब गुजर, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष पियुष विजयकुमार शहा, उपाध्यक्ष निलेश खाणेकर, जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, नयी उडान संस्थेच्या रती पाटील, अविनाश घोलप तसेच उत्सव प्रमुख रोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
न. म. जोशी म्हणाले, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. सामाजिक कार्य हे मनापासून आणि तळमळीने केल्यास त्याचे समाजावर सकारात्मक परिणाम होतात.
पियुष विजयकुमार शहा म्हणाले, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्येही विविध खेळांविषयी प्रचंड आवड आणि क्षमता असते. मात्र, अनेकदा आवश्यक क्रीडा साहित्य आणि साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना आपली गुणवत्ता विकसित करण्याची संधी मिळत नाही. ही कमतरता दूर व्हावी आणि विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार आहे.
यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या ११ हजार वडापाव वाटपाच्या उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेल्या नोंदीबद्दलचे प्रमाणपत्र डॉ. अविनाश सकुंडे आणि हेमंत जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पा घाटे यांनी केले. प्रास्ताविक पियुष विजयकुमार शहा यांनी, तर आभार जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भरत कांबळे, विशाल शितोळे, सारंग सराफ, ऋषभ जोशी, समीर पोटे, शुभम वेदपाठक, सुभाष गोरे तसेच वसंत खुटवड यांनी विशेष परिश्रम घेतले.

