पुणे- केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणें ना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का?असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्षआ. चंद्रकांत पाटील यांनी केला आहे . स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याच तालमित घडलेले नारायण राणे आक्रमक म्हणूनच ओळखले जातात. ती त्यांची शैली आहे. प्रत्येकाची एक शैली असतेच. मी शैलीचं समर्थन करत नाही, पण त्यासाठी थेट अटक कितपत योग्य ठरेल? राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? सरकार, प्रशासनाने याविषयी त्यांच्याशी चर्चा करावी.असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, ते पुढे म्हणाले,आक्रमक शैलीत ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची या पूर्वीची सर्वांची सर्व भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं माझं मत आहे.
नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो.असेही पाटील म्हणाले .