नवी दिल्ली- संसदेचे यावर्षीचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात कामकाजाचे 19 दिवस असणार आहे. हे अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
RTPCR चाचणी सर्वांना असेल अनिवार्य
अधिवेशनादरम्यान, कोरोना प्रॉटोकॉलचे पुर्णपणे पालन केले जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणी सर्वांना अनिवार्य असेल. सर्व सदस्य आणि माध्यमांना परवानगी दिली जाणार असून त्यांनी लस घेतली आहे का? हे तपासले जाणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे बिर्ला यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी 14 सप्टेंबर सुरु झाले होते अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन हे दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते. स्वातंत्र्य दिनाच्या आधी हे अधिवेशन संपवले जाते. पण गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत अधिवेशन घेण्यात आले होते.
शेतकरी कायदा रद्द करण्याची होऊ शकते मागणी
हे पावसाळी अधिवेशन 19 दिवस चालणार आहे. अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्ष सरकारला कोरोना, शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी करु शकते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार गदारोळ होऊ शकतो. त्यासोबतच केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये अनेक विधेयक सादर करु शकते.