काही वर्षांपूर्वी नव-या मुलीच्या मनाची घालमेल ही अगदी लग्न ठरल्यापासूनच्या क्षणापासून असायची. घरच्यांनाही चिंता असायची, आणि मग सासरी जाण्याचा क्षण जवळ येताना भावनांचा बांध फुटायचा. पण आताच्या मोबाईल आणि फेसबुकच्या जमान्यात ही परिस्थिीती बदलली आहे हे मात्र खरे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलीच्या घरच्यांना ही काळजी असायची. आता स्वतंत्र संसार असतो त्यामुळे सासरी अॅडजस्टमेंट करण्याचा प्रश्न तसा येत नाही. मुलीही आता मुलांइतक्याच शिकलेल्या सवरलेल्या आहेत. आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्य आहे, बहुतेक ठिकाणी स्वयंपाकाला बाई आहे मग माहेरी स्वयंपाक करत होत्या की नाही किंवा स्वयंपाक येत होता का याचा प्रश्नच येत नाही. आणि आता यु- टुब वरून ही नवीन पदार्थ शिकण्याची सोय झाली आहेच की. आणि त्यातूनच अंगावर पडले की शिकतात अनुभवातून. माझी एक जीवाभावाची मैत्रीण आहे. लग्नाआधी तिला स्वयंपाक काही विशेष येत नव्हता. शिक्षणाच्या निमित्ताने ती हॉस्टेलवर होती 4 वर्षे आणि त्याच दरम्यान तिच्या आईचे ही निधन झाले. घरात बाकी कोणी बाई माणूस नाही त्यामुळे स्वयंपाक शिकायचाच राहीला. लग्न करुन ती अमेरिकेला गेली. वडिलांना चिंता हिचे कसं होणार? पण हळूहळू सगळं शिकली. आता ती फेसबुकवर चॅटिंग करताना एकेक मजेशीर अनुभव सांगते आणि काही गोष्टी विचारून पण घेते. आज तिच्या वडिलांचे डोळे हे सगळं ऐकताना सुखाने पाणावतात. मोबाईलसारख्या संवादांच्या साधनांमुळे विवाहित मुलींना कधीही घरच्यांशी संपर्क साधणे सहज सोपे झाले आहे.
थोडक्यात, काय तर मुलींची माहेराविषयी माया पातळ झाली नाही तर, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात सगळ्या सोयी सुविधा आल्या. प्रत्यक्ष भेटी-गाठीतून होणारा आनंद आणि त्यामुळे व्यक्त होणा-या भावना व्यक्त करण्याचे मार्ग मात्र बदलले गेले आहेत.
– पुर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068