पुणे : “अपेक्षांच्या ओझ्यातून येणारा ताण, ‘टेस्ट’ घेण्याची उत्सुकता, सामाजिक दबाव यातून माणूस व्यसनांच्या जाळ्यात अडकतो. याशिवाय, आजचे तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आभासी माध्यमातून बाहेर पडून परस्परांतील संवाद आणि व्यसनांच्या आहारी गेलेल्यांचे योग्य समुपदेशन यातूनच व्यसनमुक्ती शक्य होईल,” असे प्रतिपादन मुक्तांगण व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी केले.
समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी आणि नीती-मूल्यांच्या शिक्षणातून समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता पुणतांबेकर ‘व्यसनाधीनता आणि आपण’ या विषयावर बोलत होत्या. संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, उद्योजक यशराज पारखी, बॉल स्टेट युनिव्हर्सिटीच्या मिलर कॉलेज ऑफ बिझनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा, बॉल स्टेट युनिव्हर्सिटीतील डॉ. मारी तेरेसा, इनोसर्वचे सहसंस्थापक राहुल जैन आदी उपसाठो होते.
मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, “कामामुळे, अपेक्षाभंगामुळे येणारा ताण, सामाजिक प्रतिष्ठा, वाईट संगत यामुळे तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. पालकांकडून त्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही, हेही कारण त्यामागे आहे. ग्रामीण आणि शहरी बायकांमध्ये व्यसने वाढत आहेत. त्यांच्याकडून सुपरवूमेन बनण्याची आकांक्षा त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तरुणाई इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात असून, सोशल मीडिया, पॉर्नसाईट्स यामध्ये अडकली जात आहे. त्यामुळे त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन व भूमिका महत्त्वाची आहे. एकमेकांमध्ये संवाद वाढायला हवा.’’
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “तंबाकू, दारू, गुटखा, जंक फूडचे सेवन, सोशल माध्यमांचा अतिवापर, स्क्रीनचे व्यसन यासह मनातील वाईट विचार, सायबर गुन्हेगारीला बळी पडणे, त्यातून निर्माण होणारा ताण-तणाव, नात्यांमधील दुरावा अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ, मार्गदर्शकांना बोलावून त्यामार्फत विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांच्या मनाची मशागत करून सदृढ, सुंदर मन घडविण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी एकमेकांशी चांगले वागावे, संवाद ठेवावा, यासाठी नीतिमूल्यांची शिकवण दिली जाणार असून, त्याची सुरुवात सूर्यदत्ता ग्रुपच्या विद्यार्थी-शिक्षकांपासून केली जाणार आहे. त्यानंतर ही चळवळ देशव्यापी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच एका ऍपची निर्मिती केली जाणार आहे.”