मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण द्यावं, अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील मित्रपक्षांच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं केली. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदं घेऊन भाजपशी तडजोड करून सरकारमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन हि यावेळी त्यांनी केले .केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात रासपचे प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संदीप पाटील, रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, भुपेश थुलकर, गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, एम. एस. नंदा, जगदीश गायकवाड, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचं विधान केलं. निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावं, अशी विनंती आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.येत्या १० नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट नियमानुसार लागू होऊ शकते यात राष्ट्रापती राजवट लागू करण्याची कोणतीही धमकी नाही, असं मत आठवले यांनी मांडलं. राज्यात सरकार लवकर स्थापन झालं पाहिजे. मात्र अद्याप माझ्याकडं कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं.