मुलांचे चांगले संगोपन हे खूप महत्वपूर्ण असते. मुलांच्या वागणूकीमधून त्याच्या कुटुंबियांचे चरित्र झळकते. त्यामुळेच मुलांना चांगले संस्कार देणे जास्त गरजेचे आहे. सध्या संगोपन हे मोठमोठ्या डिग्रीचे प्रशिक्षण देणे इतकेच मर्यादित झाले आहे. मात्र औपचारिक शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणेही तितकेच महत्वाचे असते. कारण चांगले संस्कार हे आयुष्यभर सोबत करतात. मुलांना लहानपणापासूनच अशी शिक्षा दिली पाहिजे की त्यांना इतरांच्या हक्काच्या वस्तू ओरबाडून न घेता, प्रसंगी आपल्या जवळच्या वस्तूदेखील इतरांना द्यावी. मुलांच्या चांगल्या कामांचे कौतुक करावेच, परंतु वाईट कामांबद्दल त्यांची कानउघडणीदेखील करावी. प्रसंगी शिक्षादेखील दिली पाहिजे. आपल्या मुलांनी चूक केली, वाईट कृत्य केले तर त्याला शिक्षा देण्याची हिम्मत आई-वडिलांनी केली पाहिजे. त्यासाठी कोणत्या कायद्याची गरज नाही. देशात चरित्राची स्थापना व्हायची असेल, तर त्याची सुरवात घरापासून झाली पाहिजे.मुला-मुलीनी चूकीचे वागले तर त्यांना पाठिशी न घालता त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे, असा संदेश मुनिश्री प.पु. 108 पुलकसागर महाराज यांनी मंगळवारी दिला.
सकल जैन वर्षायोग समितीतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील सतराव्या पुष्पात’कैसे करे परवरीश’या विषयावर मुनिश्री बोलत होते. यावेळी मुनिश्रींनी “मुलांवर चांगल्या संगोपनाची आवश्यकता’ याविषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष सुजाता शहा, जितेंद्र शहा,सुरेंद्र गांधी,वीरकुमार शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते,दै.पुण्यनगरी चे संपादक श्रीकांत साबळे,संत साहित्याचे अभ्यासक विचारवंत रामचंद्र देखणे ,सौराष्ट्र जैन स्थानकवासी संघाचे दीपक मेहता, सेनापती बापट रस्ता येथील वर्धमान प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विलास राठोड, अशोक जैन, प्रकाश बाफना यांनी आवर्जून उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेतला. तसेच चार्टड अकाउंट विजय छल्लानी, सुभाष नहार, चिंचवड येथील अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या उपाध्यक्षा अंजली शहा, घुंबड समाज संघटना महिला अध्यक्षा तनुजा शाह यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौराष्ट्र जैन स्थानकवासी संघाचे दीपक मेहता आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापना, मुनिश्रींचे पादप्रक्षालन आणि शास्त्रभेट हे विधी संपन्न झाले.निरा येथील नवजागृती सर्वज्ञश्री महिला मंडळतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
याप्रसंगी मुनिश्री पुढे म्हणाले,” २१ वे शतक इंटरनेटचे युग आहे या युगात, या काळात मुले शिकविण्यातून नाही दाखविण्यातून शिकतात. मुले कॅमेऱ्याप्रमाणे असतात, तुम्ही जे आचरण त्यांच्या समोर ठेवाल तेच आचरण त्यांच्याकडून अवलंबले जाते. जे पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे जसे तुम्ही मुलांसोबत वागाल, तसेच तुमची मुले तुमच्यासोबत वागतील. मुलांचे जीवन बदलण्यासाठी आधी पालकांनी स्वत:चे जीवन बदलावे. त्यांना चांगले संस्कार देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आई-वडिलांवर असते.चांगल्या संस्काराद्वारे एक मुलगा घडविणे हे एक विद्यापीठ घडविण्याइतके मोठे काम आहे.”
याप्रसंगी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते म्हणाले,’ सध्या सर्वच धर्मांमध्ये पंथ उपपंथ निर्माण झाले आहेत.समाजातील एकोप्याच्या दृष्टीने सर्व धर्मातील पंथ उपपंथ एकत्र आलेच पाहिजेत.मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या पुढाकाराने हे पंथ- उपपंथ एकत्र येण्यास सुरुवात व्हावी हेच या चातुर्मासाचे फलित असेल.’
संत साहित्याचे अभ्यासक विचारवंत डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले “” आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग, व्यासंग आणि सत्संग हे तीन संग आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. प्रसंगाद्वारे आपल्याला माहिती मिळते. व्यासंगातून ज्ञान मिळते आणि सत्संगाद्वारे चांगले आचरण मिळते. सत्संगाचे माध्यम असणारे मुनिश्रींचे विवेचन म्हणजेच ब्रम्हतत्व आहे. सदगुरू हे निर्हेतु भक्तीची स्वरूप असतात. जे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याला चांगली शिकवण देत असतात. मानवी जीवनाचा जो दगड परमेश्वराने दिला आहे. त्या दगडातून विकृतीरूपी नको असलेला भाग बाजूला काढून एक सुंदर मुर्ती घडविण्याचे काम सदगुरू करतात.”
याप्रसंगी प्रवचनास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. समितीचे सचिव जितेंद्र शहा यांनी आभार प्रदर्शन केले.