पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ज्यांचे नाव कायम घेण्यात येते आहे त्या मिलिंद एकबोटे यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे . कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली होती. या दंगलीच्या मुख्य सूत्रधारांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असूनही सरकारने त्यांना अटक केलेली नाही. ही बाब लोकशाही व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक आहे. अटकेची मागणी घेऊन विविध 35 संघटनांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत 18 जानेवारी रोजी या घटनेचा निषेध नोंदविला होता.
शनिवार वाड्यावरील एल्गार परिषद ३१ डिसेंबर रोजी पार पडली . त्यानंतर 1 जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद राज्यात आणि देशात काही ठिकाणी उमटले होते .
कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल
येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे.