आधुनिक विचारांनी, ज्यांनी प्रगतीची वाट दाखवली, त्या महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
समाज बदलणारे, आधुनिक समाजाचा पाया असणारे विचार महात्मा जोतीराव फुले यांनी सगळा विरोध पत्करून, तो झुगारून संपूर्ण समाजात रुजवले, याची बीज त्यांच्या आयुष्यात बालपणापासून घडलेल्या अनेक घटनांमध्ये आहेत. बालपणीच सावित्री त्यांच्या आयुष्यात आली, या दोघांनी जे समाजवास्तव पाहिले त्यावर शांत न बसता त्यांनी आयुष्यभराच्या सोबतीने क्रांतीची वाट स्वीकारली.
असे हे आदर्श सहजीवन असलेले जोडपे एकत्र आले त्याची गोष्टही मोठी रंजक आहे. तापट स्वभावाचे जोतीराव अर्थात जोती आणि सर्वांना समजून – उमजून घेणारी सावित्री अर्थात सावी यांचे लग्न हे साधेसरळ नव्हते, त्या दोघांच्या स्वभावातला विरोधाभास, फुले कुटुंबियांमधली भाऊबंदकी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक असमानतेचा मोठे दर्शन आणि या सार्याच्या विरोधात लग्नसराईत उभे ठाकलेले जोतीराव यामुळे हे लग्न सर्वस्वी वेगळे ठरते. किंबहुना वर्हाडात सर्व जातीतले गावकरी सहभागी होण्यावरून अस्पृश्यता निवारण, पापक्षालनासाठी ब्राम्हणाचे पाय धुवून तीर्थ पिणे यासारख्या निरर्थक रूढींचा ठाम विरोध, गूळ – खोबरे उधळून टाकण्याऐवजी प्रत्येकाला हक्काचा घास मिळवून देणे, या त्या काळात लग्नात सामान्य वाटणार्या गोष्टींबद्दल जोतीरावांनी घेतलेली भूमिका त्यांच्या पुढील असामान्य कार्याची चुणूक दाखवणारी ठरली.
असे हे जगावेगळे लग्न ‘सावित्रीजोती’ या मालिकेत येत्या सोमवारी 27 तारखेपासून सुरू होत असून हळद,तळी भरणे,लग्न,गोंधळ हा लग्नाचा प्रवास आठवडाभर चालणार असून येत्या 3 आणि 4 फेब्रुवारीला हा महापरिवर्तक विवाह सोहळा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७. ३० वाजता फक्त सोनी मराठीवर संपन्न होईल.
दूरचित्रवाणी मालिकांमधले हे वेगळे लग्न प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणारं आहे.