पुणे- दिवाळी होईपर्यंत पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय राबवू नये अन्यथा नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा खणखणीत इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जलसंपदा खात्याला दिला आहे .
आज निंबाळकर यांनी लेखी पत्र पाठवून हा इशारा दिला आहे . आज सकाळी खडकवासला धरण येथून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 2 मोटारी बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या पत्राला महत्व प्राप्त झाले आहे .
राजेंद्र निंबाळकर यांनी हे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांच्या नावे पाठविले आहे .4 ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याने दिलेल्या पत्राचा संदर्भ देवून त्यांनी या पत्रात म्हटले आहे की ,4 ऑक्टोबरच्या बैठकीत १३५० एमएल डी पाण्या ऐवजी महापालिकेने केवळ ११५० एम एल डी पाणी धरणातून उचलावे असे मार्गदर्शन करण्यात आले होते . त्यानुसार नियोजन आम्ही करत आहोत आणि वेळापत्रक हि करत आहोत . मात्र दिवाळी होईपर्यंत कपात लागू करू नये ,अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल .दिवाळी झाल्यावर आम्ही ११५० एम एल डी एवढे पाणी उचलू आणि तसे नियोजन राबवू या साठी वेळापत्रक बनविण्यात येते आहे .