नवी दिल्ली -अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निकालाचा देशवासीयांनी शांततेने स्वीकार केल्याबद्दल संपूर्ण देशवासीयांचे आभार व्यक्त केले. तसेच, भारतीय न्यायप्रणाली देखील अभिनंदनास पात्र असल्याचे म्हणत, न्यायव्यवस्थेचेही अभिनंदन केले. तसेच, नव्या भारतात कटुता, भीतीला थारा नसल्याचेही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या निकालानंतर समाजातील सर्वच समुदाय आणि घटकांना शांतता आणि संयमाचे आवाहन केले आहे. “अयोध्येवर निकाल लागला त्याचे समाजातील सर्वच घटक, धर्म आणि समुदायाच्या लोकांनी स्वागत केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि परंपरेचे हे द्योतक आहे. आता सर्वांनी पुढे जाऊन न्यू इंडियाचे निर्माण करावे. असे न्यू इंडिया जेथे भय, कटुता आणि नकारात्मकतेला जागा नाही.” मोदी पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत सर्वच पक्षांची बाजू अतिशय संयमाने एकून घेतली. यानंतर सर्वांचा विचार करून आपला निकाल दिला ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मोदी म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायलायने आज अशा महत्वपूर्ण प्रकरणी निकाल दिला आहे. ज्या मागे शेकडो वर्षांचा एक प्रदीर्घ इतिहास आहे. संपूर्ण देशाची ही इच्छा होती की, या प्रकरणाची न्यायालयात रोज सुनावणी व्हावी व ती झाली आणि आज निर्णय आला आहे. अनेक दशकं चालेली न्याय प्रक्रियेची आज सांगता झाली. संपूर्ण जग हे मान्य करते की, भारत जगातील सर्वात मोठा लोकाशाही देश आहे. मात्र आज जगाने हे देखील पाहिले आहे की, भारताची लोकशाही किती जिवंत व मजबूत आहे. न्यायालयाचा निर्णय़ आल्यानंतर ज्या प्रकारे समाजातील प्रत्येक वर्गाने, प्रत्येक समुदायाने, प्रत्येक पंथाच्या लोकांबरोबरच संपूर्ण देशाने खुल्या मनाने याचा स्वीकार केला. यातून भारताची संस्कृती, सद्भावना दिसते. विविधतेत एकता या मंत्राचा आज प्रत्यय आला.