ओतुर(संजोक काळदंते)-
जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील शिवारात आणि गावात देखील बिबट्याचा वावर असल्याबाबत जोरदार चर्चा आहे.मात्र हे शिवारांमध्ये फिरणारे बिबटे आता एक दोन नसुन चार चार बिबटे आढळुन येत असल्याने शेतकरी वर्गासह जनता त्रस्त झाली आहे.
ओतुर, अहीनवेवाडी, चारपडाळी,सारणी, तांबेमळा ,ढमालेमळा या भागात तर आता गेली काही दिवसांपासुन दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे तसेच हे बिबटे आता घोळक्याने शेतवस्तीवर फिरु लागल्याने शेतकरी वर्गासह नागरीकांमधे भितीचे वातावरण आहे.
ओतुर परिसरातील अमिरघाट येथे गेल्या शुक्रवारी (दि.२२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ एका ऊसाशेजारील शेतात मेंढ्या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला करुन एक मेंढी जख्मी केली तर एक मेंढा ठार करुन ऊचलुन नेला यावेळी आरडा ओरडा झाल्याने स्थानिक शेतकरी भरत शेटे आणि ईतर शेतक-यांनी घटनास्थळी जमा होऊन बिबट्या गेलेल्या दिशेने पाठलाग केला असता त्यांना बिबट्यांचा अक्षरशः घोळकाच दिसला कधीतरी एक दोन बिबट किंवा पिल्ले आढळुन येत होती मात्र आता हे बिबटे जर असे घोळक्याने फिरत असतील तर ही गंभीर बाब असुन या भागातील शेतकरी प्रचंड भयभीत झालेले आहेत. शेतक-याला शेती करणे आता कठिण जात असुन कधीही कोठेही बिबट्यांचे दर्शन होत असल्याने अक्षरशः या भागात शेतीसाठी मजुर देखील सहजासहजी मिळत नाहीत असे या वेळी भरत शेटे या शेतक-याने सांगितले.
सदर घटना घडल्यावर येथिल शेतक-यांनी वनविभागाला हा प्रकार कळविला असता वनविभागाचे विशाल अडागळे , वनमजुर फुलचंद खंडागळे हे घटणास्थळी पोहोचले व पाहणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळुन आले असल्याचे अडागळे यांनी सांगितले.
पट्टेरी वाघ असल्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होती मात्र या भागात पट्टेरी वाघ नाही जर असते तर त्यांनी बिबट्यांनाही आपली शिकार केले असते तसेच जर पट्टेरी वाघ बघीतला असे वाटत असेल तर तरस असण्याची शक्यता आहे असे वनविभागाकडुन सांगण्यात आले.मात्र चार चार बिबट्यांचे जर घोळके नागरी वस्ती जवळ वास्तव्य करीत असतील तर ही चिंतेची बाब आहे वनविभागाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.शेतकरी व नागरीकांना वनविभागाकडुन जनजागृतीपर सुचना देण्याबाबत देखील विचार व्हायला हवा असे मत जयप्रकाश डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.