पुणे : भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडूतील नेते एस. व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत नुकतीच केलेली शेरेबाजी आक्षेपार्ह आहे. त्यातून भाजपच्या नेत्यांची महिलांबद्दल मानसिकता कशी आहे, हे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याचा तीव्र निषेध करीत आहे. अशी प्रतिक्रिया प्रसिध्द केलेल्या पत्रकात शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी दिली .
पत्रकार हा लोकशाहीतील चौथा महत्त्वाचा स्तंभ आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झालेल्या जनजागरणात वृत्तपत्रांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे निकोप लोकशाहीसाठी सजग पत्रकार हा घटक महत्त्वाचा आहे, या वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विश्वास आहे.
महिलांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली. विधानसभा आणि लोकसभेतही महिलांचा टक्का वाढला आहे. समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात महिला आज मागे नाहीत.
कर्तृत्त्वाची नवी नवी शिखरे त्या पादाक्रांत करीत आहेत. त्यात महिला पत्रकारांचाही मोठा सहभाग आहे. स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या वार्तांकनामुळे अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला आहे. याची जाणीव राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाणीव आहे. त्यामुळेच महिला पत्रकारांबाबत भाजप नेते एस. व्ही. शेखर यांनी केलेल्या टीपण्णीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र शब्दात निषेध करीत आहे. तसेच महिलांबाबत वक्तव्ये करण्याबाबत भाजपने आपल्या नेत्यांना समज द्यावी, असे आवाहनही यावेळी या प्रसिध्द केलेल्या पत्रकात शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी केले.