पुणे : महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत 968 कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या वीजयंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे तर 691 कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे (मुळशी विभाग), जुन्नर व आंबेगाव (मंचर विभाग) तालुक्यामध्ये पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण 1367 कृषिपंपांना एचव्हीडीएसमधून वीजजोडण्या देण्यात येत आहेत. त्यापैकी 968 कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यासाठी वीजयंत्रणेच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे तर तपासणी अहवाल पूर्ण झाल्यानंतर 876 रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यापैकी 691 कृषिपंपांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
प्रचलित पद्धतीनुसार कृषीपंपांना 63 केव्हीए /100 केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास 15 ते 20 कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.
उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल. एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषिपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये 10 केव्हीए, 16 केव्हीए व 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण सुद्धा अतिशय नगण्य राहणार आहे.