पुणे -करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशाच्या सीमा बंद करा, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी मात्र, ते धुडकावून लावत अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमध्ये आणून त्यांचा प्रचार केला.चीनच्या अध्यक्षांनाही भेटले. त्यातून करोनाचा प्रसार वाढला ,देशाला संकटात टाकायचे , देश विकायचे , देशातील लोकांना बेरोजगार करायचे पाप मोदी सरकारने केले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला .
चंदूशेठ कदम यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज रविवारी झाले. या वेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे व अविनाश बागवे, माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, , कमल व्यवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, विजय खळदकर, शिवा मंत्री, अमीर शेख, विशाल मलके आदी उपस्थित होते. चंदू शेठ कदम यांच्यावतीने लसीकरणासाठी २५ लाख रुपयांचा धनादेश या वेळी भारती हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आला.
नाना पटोले म्हणाले,’स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात कॉंग्रेसने देश उभा केला. देशाचा विकास साधला. मात्र, विकासाच्या बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने करोनाच्या काळात लोकांना घरी बसवून देश विकण्याचे पाप केले, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. तर देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले.
काँग्रेसने इतक्या वर्षात उभे केलेले कार्य मोदी सरकारने मोडीत काढले. नोटाबंदी आणि जीएसटी आणून देशाला देशोधडीला लावले. काळा पैसा, जीएसटी, पंधरा लाखांचे अमिष दाखवून नागरिकांना फसवले. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशाच्या सीमा बंद करा, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी मात्र, ते धुडकावून लावत अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमध्ये आणून त्यांचा प्रचार केला.चीनच्या अध्यक्षांनाही भेटले. त्यातून करोनाचा प्रसार वाढला, असे पटोले म्हणाले.
मोदी सरकारने करोना काळात लोकांच्या मनात भीती निर्माण केली. थाळ्या वाजवायला लावल्या. लोकांना घरात बसवून त्याच काळात कॉंग्रेसने उभ्या केलेल्या संस्था, कंपन्या विकल्या. अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. लस तयार झाल्यावर ती देशातील नागरिकांना न देता पाकिस्तानसह जगभर मोफत वाटली. लशीचे कामही खासगी कंपन्यांना दिले, अशी टीकाही पटोले यांनी केली.
मोदी सरकार प्रत्येकाला लस देणार नाही. नागरिकांना वाचवणार नाही. त्यासाठी कॉंग्रेसचीच गरज आहे. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी आपण सर्वांनी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत, असे पटोले यांनी सांगितले. चंदू कदम यांच्या उपक्रमाचे कौतुक करत भाजपवाल्यांना महापालिकाही चालवता येत नाही, असा चिमटाही पटोले यांनी काढला.
कोरोनामुक्ती साधण्यास लसीकरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा आहे. काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या मोफत लसीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून माझा संपूर्ण प्रभाग कोरोनामुक्त करणार, अशी ग्वाही कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी आज येथे दिली.
भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेत पाच हजार गरजू महिलांना मोफत लस दिली जाईल, असे चंदूशेठ कदम यांनी सांगितले
आबा बागूल यांनी आभार मानले.