मुंबई-खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.संजय राऊत यांना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही धमकी आल्याची माहिती आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. तसेच, मुंबई पोलिस आयुक्तांकडेही यासंदर्भात संजय राऊत यांनी तक्रार दिली आहे.
संजय राऊत यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांची हत्या करू. लॉरेन्सकडून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असे धमकीत म्हटले आहे.
आपल्याला आलेल्या धमकीबाबत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. सजंय राऊत म्हणाले, ज्या गँगने सलमान खानला धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. यासंदर्भात काही जणांना पकडले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सरकारवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे मी केवळ पोलिसांना धमकीबाबत माहिती दिली आहे. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धमकीबाबत तक्रार करतो, तेव्हा ते आमची चेष्टा करतात. म्हणतात की, हा विरोधकांचा स्टंट आहे. सरकार आमच्या धमकीला गांभीर्याने घेत नाही.संजय राऊत म्हणाले की, याआधी ठाण्यातील एका गुंड टोळीच्या म्होरक्यानेही मला धमकी दिली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका नातेवाईकही सहभागी असल्याचा आरोप मी केला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले होते. मला आता लॉरेन्स बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीचा राजकीय इश्यू करायचा नाही. एकीकडे विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. दुसरीकडे, सर्व सुरक्षा व पोलिस हे गद्दार गट, त्यांचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढेपाळली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.