महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची उपस्थिती आणि सत्कार
पुणे :
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच फक्त १४ वर्षाखालील कुस्तीगीर मुलींसाठी मॅटवरील तालुकास्तरीय निमंत्रित ,रोख इनामाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत पैलवान कै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘कै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान’ तर्फे ८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ ते ६ या वेळेत राधाकृष्ण गार्डन( आंबेगाव, कात्रज) येथे ही कुस्तीस्पर्धा होणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक वैजयंती वसंतराव बेनकर,गौरी बेनकर -पिंगळे,सारिका बेनकर- डोके, दुर्गा बेनकर-बोरावके यांनी या स्पर्धेची माहिती दिली. महेंद्र डोके, धनंजय बेनकर, ऋषीकेश बेनकर,कपिल बोरावके, अक्षय पिंगळे , संदीप वांजळे,एड.मंगेश ससाणे,राहुल बेनकर,सचिन बेनकर उपस्थित होते.हे सर्व स्पर्धेला विशेष सहकार्य करीत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, कुस्तीगीर कोमल गोळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची उपस्थिती आणि सत्कार यावेळी करण्यात येणार आहे . ३० ते ६२ किलो दरम्यान एकूण १० गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.९ वाजता नोंदणी, वजन घेण्याची प्रक्रिया होईल.
आपल्या पैलवान वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तिन्ही लेकींनी मिळून या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत . संपूर्ण पणे महिला साठी सर्व गटामध्ये होणारी एकमेव स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. तालुका स्तरीय स्पर्धा असली तरी या स्पर्धत अनेक चांगल्या कुस्तीगीरांची कुस्ती पाहण्याची संधी पुणेकरांना वसंतराव बेनकर प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा सर्व पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा व याचा आनंद घ्यावा, असे आवाहन निमंत्रक वैजयंती वसंतराव बेनकर यांनी केले.
सामाजिक बांधिलकीचे जपणूक करण्यासाठी या कुस्ती स्पर्धेसाठी त्यांचा एकच उद्देश आहे की, आपल्या भागातील महिला कुस्तीगीर यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणे व अशा स्पर्धेतून भावी ऑलिम्पिकपटू जागतिक विजेती राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत ,हाच उद्देश व पैलवान वडिलांना हीच खरी आदरांजली असे या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. .
कुस्तीतील मानदंड :पैलवान वसंतराव सयाजी बेनकर
त्यांनी वयाच्या ११ वर्षापासूनच तालीम मध्ये जायला सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच कुस्ती क्षेत्राची आवड होती . त्यांनी पहिले पाच ते सहा वर्ष ते धायरीतील तालमीमध्ये तयार झाले. त्यानंतर ते पुण्यातील चिंचेचे तालीम तसेच नवी पेठ तसेच गणेश पेठेतील शिवराम बाळ तालीम या ठिकाणी काही वर्ष तालमीत राहून ते पैलवान बनले. आणि कुस्त्या देखील मारल्या परंतु लहान वयातच घराची जबाबदारी पाठीवर घ्यावी लागल्याने त्यांना महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु त्यांनी आपल्या घरातील पुतण्यांना भावांना मित्रांना देखील उत्कृष्ट असे पैलवान बनवले. त्यांची शेवटपर्यंत एकच इच्छा होती की आपल्या घरातून एक तरी महाराष्ट्र केसरी व्हावा . ती त्यांची इच्छा त्यांच्या आकस्मित दोन वर्षांपूर्वी झालेल्या निधनामुळे अपूर्णच राहिली.
त्यांच्या तोंडून ऐकलेल्या पैलवानांची नावे म्हणजे हिरामण बनकर अण्णा शिंदे हरिश्चंद्र बिराजदार आणि त्यांना घडविणारे आणि त्यांच्या मनात कुस्ती विषयी आवड निर्माण करणारे आदरणीय पैलवान वस्ताद सुभाष भाऊ पोकळे. तसेच पैलवान वस्ताद खंडोजी अण्णा पोकळे या व्यक्तीमुळे व स्वतःच्या आवडीमुळे ते चांगलेच कुस्ती क्षेत्रात पुढे गेले. त्यांना १९९० साली पुणे जिल्ह्यातून शिवाजीनगर स्टेडियम मध्ये ढाल देखील मिळाली . दोन चांदीचे कप तसेच अनेक रोख स्वरूपात मानधन व बक्षीस मिळवले. ते महाराष्ट्रातील सर्व खेड्यातील आखाडे चार महिने फिरायचे
ते नेहमी सांगायचे इंदापूरला निमगाव या ठिकाणी अण्णा शिंदे तसेच अकलूज या ठिकाणी मोहिते पाटील व लिंबोजेचे संभाजीराव काकडे हे त्यांना पुण्यावरून आलेत म्हणून दोनदा दोनदा कुस्ती खेळण्याचा मान द्यायचे. त्यांनी महाराष्ट्रभर खेडोपाडी जाऊन अनेक आखाडे गाजवले अशी त्यांची पैलवानकीची कारकीर्द ही सदैव आम्हाला प्रोत्साहन देणारी राहील. त्यांच्या जीवनातील सर्वात आवडीचे क्षेत्र असणारे कुस्ती क्षेत्र हेच आम्ही त्यांच्या पुण्यस्मरणार्थ निमित्त आखाडा भरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. एकच आवर्जून सांगावेसे वाटते की परिस्थितीमुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही.
कारण उत्कृष्ट पैलवान होण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे खाद्य देखील लागत पण हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ते मिळत नसे पण तरीही त्यांनी परिस्थितीवर मात देऊन अनेक आखाडे गाजवले आम्हीही मुलींची कुस्ती भरवण्याचा आमचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे समाजाने जास्तीत जास्त मुलींना या कुस्ती क्षेत्रामध्ये आणावे व मुलं-मुली समान हा आदर्श समाजापुढे घालून देणे हा आहे