नवी दिल्ली,– एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या आणि स्टार अलायन्स सदस्य विमानसेवा कंपनीने आजपासून अमृतसर ते लंडन गॅटविक मार्गावर पहिल्यांदाच विना थांबा सेवा सुरू केली. त्यामुळे एयर इंडिया ही इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या गॅटविक विमानतळावर सेवा देणारी पहिलीच विमानकंपनी ठरली आहे. गॅटविकला दिली जाणारी सेवा ही कंपनीच्या भारतातील प्रमुख शहरांपासूनची कनेक्टिव्हिटी विस्तारण्याच्या तसेच प्रवाशांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचा भाग आहे.
पूर्णपणे सपाट होणाऱ्या बेड्ससह १८ बिझनेस क्लास सीट्स आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्सचा समावेश असलेले बोईंग 787-8 ड्रीमलायनर अमृतसर येथून आठवड्यात तीनदा म्हणजेच सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कार्यरत असेल. अमृतसरपासून सुरू झालेल्या या विमानसेवांशिवाय एयर इंडिया अहमदाबाद, गोवा आणि कोची येथून ९ इतर साप्ताहिक विमानसेवा देणार असून त्यामुळे गॅटविकला जाणाऱ्या साप्ताहिक विमानसेवांची एकूण संख्या १२ पर्यंत जाईल. या नव्या सेवेमुळे एयर इंडियाचे इंग्लंडमधील अस्तित्व, कामकाज आणि नेटवर्क आणखी मजबूत होईल. सध्या कंपनीद्वारे इंग्लंडला ४९ विमानसेवा दिल्या जात असून त्यात लंडनला (हिथ्रो आणि गॅटविक) जाणाऱ्या ४३ विमानसेवा आणि बर्मिंगहॅमला जाणाऱ्या सहा विमानसेवांचा समावेश आहे. एयर इंडियाद्वारे हिथ्रो, लंडन येथे दिल्ली व मुंबईपासून ३१ साप्ताहिक विमानसेवाही सध्या दिल्या जात आहेत.
माननीय नागरी विमानवाहतूक मंत्री श्री. ज्योतीर्रादित्य एम. सिंदिया, नागरी विमानवाहतूक विभागाचे राज्यातील माननीय केंद्रीय मंत्री, जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव, पंजाब, श्री. तरुण चौघ विमानसेवेच्या व्हर्च्युअल उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते. त्यांनी श्री. राजीव बन्सल, सचिव, नागरी विमानवाहतूक आणि एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक
कॅम्पबेल विल्सन यांच्या उपस्थितीत विमानउड्डाणाला हिरवा झेंडा दिला.
याप्रसंगी नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतीर्रादित्य एम. सिंदिया म्हणाले, ‘अमृतसर आणि पंजाबसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. या नव्या विमानसेवेमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, इंग्लंडपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि लोक आणखी जवळ येतील. यामुळे व्यापार- पर्यटनास चालना मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील.’
मंत्री श्री. ज्योतीर्रादित्य एम. सिंदिया यांनी एयर इंडियाचे फ्लीट संपादन केल्याविषयी कौतुक केले तसेच एयर इंडिया लवकरच सर्व खंडांना जोडेल आणि भारताला विमानसेवेचे जागतिक केंद्र बनवेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांना संबोधत मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘Vihaan.AI या पाच वर्षीय योजनेचा भाग म्हणून आम्ही भारतातील प्रमुख शहरे आणि प्रमुख जागतिक स्थळे यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे तसेच भारताचे उडते जागतिक दूत म्हणून ओळख मिळवण्याचे ठरवले आहे. या विमानसेवांमुळे भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवरून इंग्लंडला आणि इंग्लंडवरून भारतातील लोकप्रिय स्थळापर्यंत थेट हवाई कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्याची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल.’
या लाँचप्रसंगी अमृतसरच्या श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यमंत्री, वाणिज्य आणि व्यापार, श्री. सोम प्रकाश, आमदार श्री सरदार सुखविंदर सिंग आणि सचिव- नागरी विमानवाहतूक खाते (पंजाब) श्री. मालविंदर सिंग जग्गी यांनी दीपप्रज्वलन आणि फीत कापून उद्घाटन केले. अमृतसरपासून प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशास बोर्डिंग पास प्रदान करण्यात आला. या समारंभासाठी एयर इंडिया, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व इतर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर तसेच प्रवासी उपस्थित होते.
अमृतसर ते गॅटविक मार्गावरील पहिल्या AI 169 विमानाने वेळेवर म्हणजेच दुपारी १.२० वाजता उड्डाण केले व ते गॅटविक येथे त्याचदिवशी संध्याकाळी ५.५५ वाजता पोहोचले. यापूर्वी गॅटविक विमानतळावरून AI 170 ने रात्री ९.४० वाजता उड्डाण केले होते व ते अमृतसर येथे १०.१५ वाजता पोहोचले (सर्व वेळा स्थानिक).
एकंदरीत एयर इंडियाद्वारे दर आठवड्याला इंग्लंड व युरोपमधील सात महत्त्वाच्या शहरांसाठी ८० विमानसेवा दिल्या जातात. त्याचबरोबर कंपनीने मिलान, व्हिएन्ना आणि कोपनहेगनसारख्या युरोपमधील निवडक ठिकाणच्या विमानसेवा नव्याने सुरू केल्या आहेत.
या विमानसेवा एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अपवर, अधिकृत ट्रॅव्हल एजंट व बुकिंगच्या इतर माध्यमांतून आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.