विरोधात बोललो तर निधी शून्य ..कोणाकोणाचा निधी शून्य करणार ?
अजितदादा असते तर अशी हिंमत झाली असती काय ?
दोन नगरसेवकांचा निधी शून्य केल्याने नाराजी; राजकीय मतभेदांचा परिणाम नगरसेवक आणि नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये
पुणे : महापालिकेतील सभागृह नेते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे असा परिचय असलेले सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून भाजपशी लढत देऊन निवडून आलेले अमोल बालवडकर यांच्या नंतर खुद्द सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांचाही वार्ड स्तरीय निधी गोठविला आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या मार्फत वार्डा वार्डात विकास कामेच होऊ द्यायची नाहीत आणि भाजपचा आपल्या मर्जीतील नगरसेवकांचा वरचष्मा कसा राहील असे धोरण राबवायचे हि पद्धती भाजपकडून अवलंबली जात असल्याचा आरोप आणि विरोधात बोललो तर निधी शून्य ..कोणाकोणाचा निधी शून्य करणार ? अजितदादा अस्तेतर अशी हिंमत झाली असती काय ? असा सूर एकंदरीत राष्ट्रवादी आणि अन्य राजकीय पक्षात सुद्धा उमटत असताना याच पार्श्वभूमीवर आता अजितदादांचे जिवलग सहकारी म्हणून गणले गेलेले माजी आमदार सुनील टिंगरे यांनी आता महापालिकेतील भाजपा नेत्याच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र पाठवले आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली असतानाही मित्रपक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अन्यायकारक वागणूक मिळत असल्याची तक्रार वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी काळात पक्षाच्या अन्य नगरसेवकांच्या निधीबाबतही अशाच प्रकारची भूमिका घेतली जाण्याची चर्चा सुरू असल्याचे टिंगरे यांनी पत्रात म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या राजकीय मतभेदांचा परिणाम संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि पर्यायाने त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांवर होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
माजी आमदार सुनील टिंगरे यांनी २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे काम करत असून, विकासाला प्राधान्य देत राज्याच्या हितासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्याच भावनेतून पुणे महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने सहकार्य केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पक्षाच्या नगरसेवकांबाबत घेतल्या जाणाऱ्या काही निर्णयांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांच्या निधीबाबतही अशाच प्रकारची भूमिका घेतली जाईल, अशी चर्चा पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या राजकीय मतभेदांचा परिणाम संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि पर्यायाने त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांवर होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक महायुतीतील घटक पक्षांना स्वतंत्रपणे लढवावी लागली. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले असले तरी महायुतीचा धर्म आणि व्यापक विकासाचे हित लक्षात घेऊन पक्षाने सहकार्याची सकारात्मक भूमिका घेतली. महापौर व उपमहापौर निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेतल्याचे टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी तसेच विविध विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, असे टिंगरे यांनी म्हटले आहे.
मात्र, त्यानंतरच्या काळात स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना राष्ट्रवादी काँग्रेसला एकही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू नये अशा पद्धतीने रचना झाल्याची भावना आहे. या निर्णयांचा थेट परिणाम नगरसेवकांच्या कामावर आणि नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या विकासकामांवर होत असल्याचे टिंगरे यांनी पत्रात म्हटले आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप या प्रश्नावर अपेक्षित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा टिंगरे यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या सर्व परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या सहकार्याच्या भूमिकेत कोणतीही तडजोड केलेली नाही. नुकत्याच पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत विमाननगर येथील ‘भारत मंडपम’ या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही व्यक्ती किंवा पक्षविरोधाची नसून विकासाच्या मुद्द्यांवर सहकार्याची असल्याचे स्पष्ट होते, असे टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
“आमचे नेते स्व. अजितदादा पवार यांनी आम्हाला नेहमीच विकासाचे आणि सकारात्मक राजकारणाचे संस्कार दिले. महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेदांचा परिणाम शासनाच्या कामकाजावर किंवा नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, हीच त्यांची भूमिका होती. त्याच विचाराने आम्हीही काम करत आहोत,” असे टिंगरे यांनी म्हटले आहे.
महायुतीतील वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कोणत्याही टीका-टिप्पणीचे आपण समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. संबंधित बाबींमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य ती दखल घेतली आहे, याचीही नोंद घ्यावी, असे टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री सर्व घटक पक्षांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेतील या परिस्थितीकडे वैयक्तिक लक्ष घालून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या विकासकामांसाठी समान आणि न्याय्य संधी मिळेल याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती टिंगरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एखाद्या व्यक्तीशी किंवा स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेदांमुळे त्याचा परिणाम संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये. या प्रकरणात सकारात्मक हस्तक्षेप करून महायुतीतील सहकार्याची भावना अधिक दृढ करावी, असा विश्वास आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला आहे.

