नवी दिल्ली : देशाच्या सुमारे ५० ते ६० टक्के भागावर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने या भागांसाठी पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, विषुववृत्ताजवळ आणखी एक हवामान प्रणाली सक्रिय होत आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे २० ते ३० जुलैदरम्यान मध्य प्रदेशसह उत्तर आणि मध्य भारतात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये अवघ्या १५ दिवसांत ढगफुटीच्या १६ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. काश्मीर हवामान केंद्राने आगामी काळात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, तामिळनाडूसाठी आज उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा देण्यात आला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जात आहे.
विविध राज्यांतील परिस्थिती
मध्य प्रदेश : नऊ दिवसांनंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता असून, आतापर्यंतचा पाऊस सरासरीपेक्षा १३ टक्क्यांनी कमी आहे.
राजस्थान : मान्सून अद्याप कमकुवत राहिला असून, हंगामातील पावसात १८ टक्के तूट आहे. २० जुलैसाठी १७ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
छत्तीसगड : रायपूर, दुर्ग आणि इतर भागांत रात्रभर पाऊस झाला. बिलासपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. रायगडमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
बिहार : चार जिल्ह्यांत ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. पाटण्यात तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून दमट उष्णतेचा त्रास कायम आहे.
उत्तराखंड : १० जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
यमुना नदीचे नैसर्गिक स्वरूप बदलले
दिल्ली विद्यापीठ आणि आयआयएसईआर, भोपाळच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या २२५ वर्षांत दिल्लीतील यमुना नदीची रुंदी सुमारे ६८ टक्क्यांनी, तर नैसर्गिक प्रवाह ८९ टक्क्यांनी कमी झाला आहे. मानवी हस्तक्षेप, बंधाऱ्यांची उभारणी आणि वेगवान शहरीकरण यामुळे नदीचे मूळ स्वरूप बदलल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
पुढील दोन दिवसांचा अंदाज
१८ जुलै
- ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, वादळ व विजांसह ऑरेंज अलर्ट
- बिहार, झारखंड, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हलक्या पावसाचा अंदाज
- पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू व पुद्दुचेरीत उष्ण व दमट हवामान
१९ जुलै
- आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा
- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी येलो अलर्ट
- मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट
- कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात हलक्या पावसाची शक्यता

