MPSC ऑफलाइन परीक्षा आंदोलन : दिवस ७
उद्या दुपारी १२ वाजता MPSC अधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा व Normalization लागू करण्याचा निर्णय मागे घेऊन परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाचा आज सातवा दिवस उत्साहात आणि निर्धाराने पार पडला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश उपाध्यक्ष मा. रामचंद्र (आबा) दळवी आणि प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे करत आहेत.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. तुषार गांधी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधी यांचे महत्त्व अधोरेखित केले. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांच्या भावना आणि शंका गांभीर्याने ऐकून न्याय्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुषार गांधी यांनी आंदोलनकर्त्यांच्या संयमाचे आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संघर्षाचे कौतुक करत, संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही शासन आणि आयोगाची संयुक्त जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज सायंकाळी आयोगासोबत बैठक होण्याची अपेक्षा होती. मात्र, ती बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर उद्या (१५ जुलै २०२६) दुपारी १२:०० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाची आणि विद्यार्थी प्रतिनिधींची MPSC अधिकाऱ्यांसोबत बैठक निश्चित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या ठामपणे मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये:
- MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात.
- Normalization पद्धत लागू करू नये.
- परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधी सुनिश्चित करावी.
- विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून आयोगाने स्पष्ट आणि न्याय्य भूमिका जाहीर करावी.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या विषयात संवादाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आयोगासोबतची उद्याची बैठक सकारात्मक आणि परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
“MPSC परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही आणि लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत खंबीरपणे लढत राहील,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

