मुंबई-नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमांचा) दाखला देत आधीच तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली असून, त्यांनी नांगरे पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवरही सडकून टीका केली आहे. “तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा थेट सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या ‘दुहेरी निष्ठे’वर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “एक पोलीस अधिकारी म्हणून नांगरे पाटलांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाच्या कर्तव्याशी असायला हवी. पण त्यांना त्यांची संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या भरवली जाणारी हिंदू संमेलने अराजकीय असल्याचा देखावा केला जात असला, तरी ती राजकीयच आहेत.” “एका पोलीस अधिकाऱ्याने तिथे जाऊन संघाची तोंडभरून स्तुती करणे म्हणजे निष्पक्षतेचे भान हरवणे आहे. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी ‘पुनर्वसन हमी योजना’ सुरु आहेच, तुमचंही पुनर्वसन नक्की होईल.”
नांगरे पाटलांच्या वर्दीवरून राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला. “नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे, असा आमच्या सगळ्यांचा समज होता. पण तो रंग संघाच्या आधीच्या खाकी पँटचा आहे, हे आत्ताच कळलं,” असा चिमटा त्यांनी काढला.
2012च्या ‘त्या’ घटनेची आठवण अन् सरकारला सवाल
राज ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणात धारेवर धरले. “अशी दुहेरी निष्ठा सरकारला चालते का? यावर सरकारचे गप्प बसणे हेही एका अर्थाने समर्थनच आहे. आपण कोणते चुकीचे पायंडे पाडत आहोत, याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवले पाहिजे. उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर एखादा अधिकारी दुसऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला गेला, तर तेव्हा बोंब मारू नका.” यावेळी राज ठाकरेंनी एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. “2012ला रझा अकादमीच्या विरोधात मनसेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन ‘तुम्ही पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात’ म्हणून माझे अभिनंदन केले होते. तेव्हा तत्कालीन सरकारने ‘निष्पक्षता सोडली’ म्हणून त्या कॉन्स्टेबलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मग आता हीच भूमिका हे सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का?” असा थेट सवाल राज यांनी उपस्थित केला.
चांगले अधिकारी आहात, बुद्धी गहाण ठेवू नका
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज म्हणाले, “आमदार, खासदारांना ‘आमच्याकडे या’ म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष उरलेत की नाही अशी शंका असताना, जर सरकारी अधिकारीही निष्पक्ष राहिले नाहीत तर लोकांनी कोणाकडे बघायचं? विश्वास नांगरे पाटील तुम्ही एक चांगले आणि कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेकबुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका.”
काँग्रेसचाही कडाडून विरोध
याआधी काँग्रेस नेत्यांनीही नांगरे पाटलांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. संविधानाची शपथ घेणारा एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या मंचावर जाऊन विचारधारेचे उदात्तीकरण कसे करू शकतो? यासाठी त्यांनी राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता राज ठाकरेंच्या या आक्रमक प्रतिक्रियेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे.

