भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | प्रतिनिधी
जीवे मारण्याची तसेच बांधकाम पाडून टाकण्याची धमकी देत तब्बल १० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींकडून ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी यांनी हुजूरपागा शाळेसमोरील मांगडेवाडी, कात्रज येथे ममता फाउंडेशन संस्थेसाठी इमारत तसेच राहण्यासाठी दोन घरे बांधली होती. या बांधकामाबाबत भीम संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद निवृत्ती गायकवाड यांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून बांधकाम पाडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारी थांबवायच्या असतील तर १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीकडून टायटन कंपनीचे घड्याळ, ऑनलाइन १० हजार रुपये तसेच गुगल पेद्वारे ५ हजार रुपयेही स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी खंडणीपैकी ५० हजार रुपये कात्रज येथील किनारा हॉटेल येथे स्वीकारण्याचे ठरवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून विनोद गायकवाड आणि संग्राम सोनवणे यांना ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.
या प्रकरणात विनोद निवृत्ती गायकवाड (रा. विंझर, ता. वेल्हा), संग्राम दत्तात्रय सोनवणे (रा. विंझर, ता. वेल्हा), सुधीर मुगुट शेडगे (रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि निलेश बाबन कुंभार (रा. भोर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत.
या प्रकरणातील आरोपींनी यापूर्वीही कोणाला धमकावून खंडणी किंवा मौल्यवान वस्तू उकळल्या असतील, तर संबंधितांनी पुढे येऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

