पुणे : 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त सर्व जीव मंगल प्रतिष्ठानतर्फे तंबाखूविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या दिनाची संकल्पना तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या खोट्या आकर्षणामागील सत्य समोर आणून व्यसनाला आळा घालण्याची आहे.सर्वमंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले की, आधुनिक विपणन तंत्रांचा वापर करून तंबाखू कंपन्या युवकांना लक्ष्य करत आहेत. आकर्षक जाहिराती, रंगीत पॅकेजिंग आणि विविध फ्लेवर्सच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षण वाढवले जात आहे. परिणामी अनेक तरुण व्यसनाच्या गर्तेत ओढले जात आहेत.तंबाखूचे सेवन केवळ व्यक्तीच्या आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे विकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांमुळे उपचारांचा मोठा आर्थिक बोजा निर्माण होतो. त्यामुळे तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने “मी तंबाखूपासून दूर राहीन आणि इतरांनाही तिच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करीन” हा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच शाळा, महाविद्यालये, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे युवकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे. चला, आजच तंबाखूला कायमचा निरोप देऊन निरोगी आणि सुदृढ समाज घडवूया,” असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
‘तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार’; व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढे यावे – डॉ. कल्याण गंगवाल
Date:

