काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले
हैदराबाद-आषाढीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने अख्ख्या मंत्रिमंडळासह आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी सोमवारी सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे ६०० हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांनी रोड शो केला. राव इकडे शक्तिप्रदर्शन करत असताना भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे तेलंगणातील १२ माजी आमदार व मंत्र्यांनी त्यांना धक्का देत दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी त्यांचे स्वागत केले. तेलंगणात विधानसभा निवडणूक ६ महिन्यांनी आहे. या पार्श्वभूमीवर राव यांना हा मोठा झटका आहे.पक्षफुटीमुळे केसीआर दिवसभर अस्वस्थ होते. मीडियाशीही फार बोलले नाहीत. त्यांचे चिरंजीव केटीआर एेनवेळी महाराष्ट्राचा दौरा रद्द करून तेलंगणात तळ ठोकून बसले होते.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते केसीआरचे सर्वेसर्वा, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गळाला लागले. त्यामुळे बीआरएस म्हणजे भाजपची बी टीम आहे, अशी संभावना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू झाली. त्यामुळे अजिबात न डगमगता केसीआर यांनी महाराष्ट्रात शिरकावाचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते सोमवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले.