स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : शत जन्म शोधितांना, शत आर्ति व्यर्थ झाल्या… ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला… हे हिंदुशक्ति संभूत दीप्तीतम तेजा… अशा धगधगत्या क्रांती गीतांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या स्वरमयी आविष्काराची अनुभूती पुणेकरांनी घेतली. यावेळी शतपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शौर्य गाथा कुंचल्यातून साकार करीत भारताच्या इतिहासातील सुवर्ण पान उलगडले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात शत जन्म शोधिताना या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी पंचरत्नेश्वर मंडळाचे चेतन चव्हाण, संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, पश्चिम प्रांत महामंत्री केशव कुलकर्णी, पुणे महानगर-सचिव धनश्री देवी, संघटन प्रमुख नितीन क्षीरसागर, सह सचिव योगेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गायक राजेश दातार, मीनल पोंक्षे, केतकी देशपांडे, देविका देशपांडे, श्रुती वैद्य, ईरा देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, अभिजीत नांदगावकर, योगेश बडे यांनी गीतांचे सादरीकरण केले. प्रांजली देशपांडे यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना संस्कार भारती संगीत विधा संयोजक प्रांजली देशपांडे यांची होती. यावेळी डॉ. नरेंद्र चिपळूणकर (संवादिनी), तुषार दीक्षित (कीबोर्ड),, अमित कुंटे (तबला), विनोद सोनवणे (ऑक्टोपॅड व तालवाद्य) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची सुरूवात “हे सदया गणया तार” … या गीताने झाली. त्यानंतर सावरकरांनी रचलेल्या शत जन्म शोधितांना, शत आर्ति व्यर्थ झाल्या… परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला…या गीतांतून त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले. जय देव, जय देव जय जय शिवराया… सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेल्या या स्फूर्ती गीताने सभागृहात चैतन्य निर्माण झाले. छंद नसे चांगला… सावरकरांनी रचलेल्या या लावणीतून आजही ते समाजाला प्रबोधित करतात. अनादी मी अनंत मी, अवध्य मी मला…जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे… या अशा स्फूर्तीदायी गीतांमधून सावरकरांचा जीवन प्रवास उलगडला.
यावेळी चित्रकार कुडलय्या हिरेमठ व अमीत ढोणे यांनी सावरकरांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणाऱ्या चित्राने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तर कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांवर भरतनाट्यम नृत्य सादर करीत नृत्यांगना कल्याणी साळेकर, साक्षी जोशी व ईशा वेलणकर यांनी रसिकांची वाहवा मिळविली.