दिल्ली /मुंबई/पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदावर अशोक चव्हाण ,सतेज पाटील ,यशोमती ठाकूर किंवा सुनील केदार यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. पुण्यातील कॉंग्रेसमधील प्रचंड मोठ्या गटबाजीमुळे पुणे हातातून निसटू नये यासाठी देखील पुण्यात कॉंग्रेसचे पक्ष श्रेष्ठी लक्ष घालण्याची शक्यता वर्तविली जाते आहे
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यामध्ये असलेली नाराजी हे यामागे कारण ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर बाळासाहेब थोरातांनीही आपणास गटनेते पद नको असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितल्याने त्या जागीही नवीन नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. ते कर्नाटकात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्यावर कर्नाटकांच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहेे. आता त्यांच्या जागी महाराष्ट्र काँग्रेसला नवे प्रभारी देखील मिळणार असून सध्या काँग्रेसमध्ये बदलाचे वारे असल्याचे दिसून येत आहे.
गेली काही दिवस काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार नाराजी असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधीकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर विदर्भातील नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे यांनी हायकंमाडकडे पटोलेंविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. राज्यभरात काम करण्यासाठी मतदारसंघात मजबूत पकड असणे गरजेचे असते. यात भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची चांगली पकड असून ते राज्यभर पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करू शकतात. तर सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.सुनिल केदार हे विदर्भातील मोठे नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणात मंत्रिपदावर काम केले आहे. त्यात 1995 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून सावनेर मतदारसंघातून निवडून आले. 1999 चा अपवाद सोडला तर तर त्यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात ते आजपर्यंत विधानसभेचे नेतृत्व करत आहे.राजकीय मुत्सद्दीपणा व राज्यभर नेतृत्व करण्याची क्षमता व काँग्रेसला जिंकण्याची सवय लावणारा नेता म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख असणारे सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व आहे. ज्या काळात काँग्रेसचा सर्वत्र पराभव होत होता. त्या काळात काँग्रेसला कोल्हापुरात विजय मिळवून देण्यात सतेज पाटील यांचे योगदान आहे. तर पुणे पदवीधर आणि पुण्यातील पोटनिवडणुकीत त्यांनी रवींद्र धंगेकरांचा ज्या प्रकारे प्रचार करत त्यांनी विजयी केले त्यामुळे सतेज पाटील हे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आले आहे.