पुणे-पुणे लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता असल्याचे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.या संदर्भात अजित पवार म्हणाले की, ‘मला एक बातमी अशी कळाली आहे. मला वाटत होते की, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले, त्यामुळे पोट निवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी आतल्या गोटातील माहिती मला मिळाली.’ असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
“निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. त्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मतं पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो” असेही अजित पवार म्हणाले आहेत.
अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावा सांगायला सुरुवात केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला होता. गिरीश बापट यांना जाऊन काही दिवसच झाले आहेच. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे खडे बोल त्यावेळी अजित पवार यांनी सुनावलले होते.
पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. कसब्यात विजयी ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे अशी हवा पसरविली जाते आहे मात्र त्याहून अधिक चर्चा राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या नावाची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, संजय काकडे,मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.