बालभारती -पौड रस्त्याच्या विरोधामागे पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलावते धनी’ कोण ? नदी सुधार योजनेला विरोध कोणाचा?
पुणे-कात्रजचे जंगल नाहीसे करून, टेकड्या फोडून तिथे बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या लोकांनी,नदीतील झाडी वाचविण्याच्या नावाने नौटंकी करण्याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत असताना आता थेट या विषयाला माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, आणि सुहास कुलकर्णी यांनी हाथ घातला आहे आणि बालभारती -पौड रस्त्याच्या विरोधामागे पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलावते धनी’ कोण ? नदी सुधार योजनेला नेमका विरोध कोणाचा? असे सवाल केले आहेत.
माजी विरोधी पक्षनेते केसकर, आणि सुहास कुलकर्णी यांनी असे म्हटले आहे कि,’ प्रथम पूल बांधायचे मग ते पूल तोडायचे आणि मग ते पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करायचे कुणाच्या हितासाठी?पुणेकर याचा जाब विचारत आहेत त्यामुळे तोंड लपवायला देखील जागा नाही सिंहगड रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्याला पर्याय असलेला रस्ता उखडून टाकला.
अपयश झाकण्यासाठी राजकीय पक्षांचे षडयंत्र
केसकर आणि कुलकर्णी यांनी पुढेअसेही म्हटले आहे,’ सद्यस्थितीत शहरात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे ती अपुरी आहे, सत्तेवर असताना ती नीट करण्याचा सक्षम करण्याचा प्रयत्न झाला नाही, त्यामुळे जीवघेण्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांत बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडीत पुणेकरांचा श्वासही गुदमरत आहे.मात्र सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने होणाऱ्या शाश्वत विकासाला काही राजकीय पक्षांकडून ‘खो ‘घालण्याचे कारस्थान सुरु झाल्याच्या वास्तवतेचाही आता पर्दाफाश होत आहे. सत्ता भोगूनही पुणेकरांसाठी काय केले? या प्रश्नाला सोईस्कर बगल देताना अपयश झाकण्यासाठीच काही राजकीय पक्षांकडून आता स्वयंसेवी संस्थांचा आधार घेत ,पर्यावरणाच्या नावाखाली ‘ टाहो’ फोडला जात आहे. परिणामी अचानक पर्यावरणप्रेमींचे पेव का फुटले,त्यामागे राजकारण कुणाचे आणि पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलविते धनी’ कोण ? हे प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.
ते पुढे म्हणाले,’ यासंदर्भात राजकीय आकसापोटीच बालभारती -पौड रस्त्याला विरोध होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. आज विकासाच्या दिशेने पुणे गतिमान होत आहे आणि नियोजनबद्धपणे शाश्वत विकासाचे प्रकल्प साकारत आहेत.केंद्रात मोदींचे सरकार आहे आणि राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे आणि ते शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. नदी सुधार योजनेसाठी माजीमंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी ‘जायका’ मधून निधी आणला आहे.अकरा एसटीपी प्लांटद्वारे शुद्ध केलेले पाणी नदीत सोडले जाणार आहे. शिवाय नदीचे सुशोभीकरण होणार आहे. मात्र केवळ राजकीय आकसातून विरोधाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातून पुणेकर नागरिकांसह युवा पिढीचा दिशाभूल करण्याचे डावपेच आखले जात आहे. असेच कारस्थान बालभारती -पौड रस्त्याला विरोध करण्यासाठी रचले जात आहेत. सुंदरलाल बहुगुणा अशा थोर व्यक्तीने केलेल्या “चिपको” आंदोलनाचा आधार घेऊन किंबहुना गैरवापर करून राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांनी ‘भासवा- भासवी’ सुरु केली असून पर्यावरण प्रेमींचीच फसवणूक केली जातेआहे.
ज्या सदनिकांमध्ये राहतो त्या इमारती उभारताना इमारतीचा पाया किती खोलीवर घेण्यात आला आहे, किती नैसर्गिक जलस्रोत बंद झाले. याची माहितीही कथित पर्यावरण प्रेमींनी द्यावी
केसकर पुढे म्हणाले कि,’ सत्ता भोगताना ‘आधी बांधायचे मग तोडायचे आणि पुन्हा बांधायचे’ या कारभारात कुणाचे हित जोपासले ? आणि पुण्यासाठी ठोस प्रकल्प कोणते दिले? या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये यासाठी आता पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्थांना पुढे करून सत्तेत आलेले अपयश झाकण्याचा प्रकार राजकीय पक्षांकडून होत आहे आणि त्याला पर्यावरण प्रेमी बळी पडत आहेत. त्यातही बालभारती -पौड रस्ता असो अथवा नदी सुधार योजनेला ज्यापद्धतीने विरोध केला जात आहे. त्यात अचानक पर्यावरण प्रेमींचे पेव का फुटले ? हाच संशोधनाचा भाग आहे. शिवाय पर्यावरण म्हणजे नेमके काय ? आणि पर्यावरणवादीची व्याख्या काय? याचे स्पष्टीकरण बालभारती -पौड रस्त्यासह नदी सुधार योजनेला विरोध करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमींनी द्यावे, त्यासाठी दैनंदिन कामकाजात पर्यावरण कसे जोपासले जाते, ज्या सदनिकांमध्ये राहतो त्या इमारती उभारताना इमारतीचा पाया किती खोलीवर घेण्यात आला आहे, किती नैसर्गिक जलस्रोत बंद झाले. याची माहितीही कथित पर्यावरण प्रेमींनी द्यावी. प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कितीजण करतात यासह अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी. मात्र वाढते शहरीकरण पाहता पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकासाचे प्रकल्प महत्वाचे आहेत आणि त्यासाठी बालभारती – पौड रस्ता, नदी सुधार असे प्रकल्प काळाची गरज आहे.