श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने स्वामी समर्थ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी निमित्त आयोजित सोहळ्यात स्वामी भक्त बंडोपंत तिखे यांना श्री स्वामी समर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अॅड. प्रताप परदेशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले होते. पुणेरी पगडी, पुष्पगुच्छ, महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष होते. सोहळ्यात हर्षद कुलकर्णी यांनी ‘स्वामी आणि भक्ती गीते’, मुकुंद बादरायणी यांनी ‘स्वर समर्थ अभंगवाणी’, योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी ‘स्वामीगीत सुगंध’ हे कार्यक्रम सादर केले. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती झाली पालखी सोहळ्यात रक्तदान महायज्ञाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २७५ पिशव्यांचे संकलन झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनायक घाटे यांनी केले.