महिला आरक्षण हे आदरपूर्वक दिले जावे लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांचे राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोप समारंभात प्रतिपादन
अमरावती : “लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाची पूर्वतयारी झालेली आहे. आता कोणत्याही प्रकारचा तंटा न करता हे आरक्षण आदरपूर्वक दिले जावे. महिला आरक्षण ही काळाची गरज असून या विधेयकाला यापूर्वी विरोध करणार्यांचे कृत्य योग्य नव्हते. ” असे उद्गार लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांनी काढले. आंध्रप्रदेशमधील अमरावती येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या.
आंध्रप्रदेश विधानसभा आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फौंडेशन, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने या संसदेचे आयोजन केले गेले होते.
यावेळी आंध्रप्रदेश विधानसभेचे सभापती डॉ. कोडेला शिवाप्रसाद राव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ना. श्री. एन.चंद्राबाबू नायडू, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी एसओजीचे संस्थापक – अधिष्ठाता प्रा. राहुल विश्वनाथ कराड, सुप्रसिध्द भारतीय शास्त्रीय नर्तिका डॉ. सोनल मानसिंग, श्रीमती मीनाक्षी लेखी आणि श्रीमती विजया भारती आदी उपस्थित होते.
श्रीमती सुमित्रा महाजन म्हणाल्या, “आम्ही जेव्हा आरक्षणाबद्दल बोलतो, तेव्हा ते कोणीतरी आम्हाला देत आहे, असा अर्थ नसतो. कारण महिलांनी पुढे यावे, हे महत्त्वाचे आहे.महिला या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के असूनही राष्ट्रउभारणीत त्यांना कोणतेही स्थान दिले जात नाही. आम्ही सर्वजन आरक्षणाच्या बाजूचे आहोत. लोकसभेच्या सभागृहात कोणीतरी जाहीरपणे कागद फाडते असा प्रकार आम्हाला नको आहे. कोणीतरी होय, होय होय असे ओरडतो. आणि दुसरा कोणीत तरी नाही, नाही, नाही असे ओरडतो. असे घडता कामा नये. ”
“एखाद्या झर्याप्रमाणे स्त्री कोणाशीही भांडत नाही. ती स्वतःचा मार्ग निर्माण करते. एखाद्या नदीप्रमाणे दोन्ही तीरांचे कल्याण करते.”
ना.श्री. एन्. चंद्राबाबू नायडू म्हणाले, “आम्ही लवकरच सर्व शाळा आणि कॉलेजमधून मातेचा सन्मान हा कार्यक्रम राबविणार आहोत. त्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीच्या मातांना आम्ही वर्षातून एक दिवस शाळा-कॉलेजमध्ये बोलवू. त्या मातांचे त्यांच्याक़डून पाय धुवून घेऊन त्यांचे आशिर्वाद मागितले जातील. .”
श्री.कोडेला सिवा प्रसाद राव म्हणाले, “ ही राष्ट्रीय महिला संसद इतिहास घडविणार आहे, यापुढे आई-बाप आपल्या मुलीकडे पाहून म्हणतील, होय. ही सुध्दा निश्चितच काहीतरी करेल.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ भारतीय छात्र संसदेने विद्यार्थ्यांमध्ये ज्याप्रमाणे जागृती केली, त्याचप्रमाणे ही राष्ट्रीय महिला संसद संपूर्ण देशातील महिलांचे सबलीकरण करेल. यापुढे अनेक राज्ये अशीच संसद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतील.”
नीलिमा शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.