मुंबई – गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. नव्वदच्या दशकात ‘सर्फ अल्ट्रा’च्या जाहिरातीतील ‘ढूंढते रह जाओगे’ हा त्यांचा डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता.१९८६ मध्ये आलेल्या ‘माझं घर, माझा संसार’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पन केलं होतं. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. २००१ मध्ये दुरचित्रवाणीवरील ‘ऑफिस-ऑफिस’ या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट ‘प्यार जिंदगी है’ हा होता. आसावरी यांनी १९८९ मध्ये ‘धाम धूम’ आणि ‘एक रात्र मंतरलेली’ या चित्रपटांत काम केले. तर १९९१ मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी यांची १९९३ मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका ‘जबान संभालके’ मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती. ‘सुखी संसाराराची १२ सुत्रे’ आणि ‘बाल ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांचाही आसावरी या भाग होत्या. त्यांची ‘फॅमिली नंबर १’ या मालिकेतील शालिनीची भूमिकाही फार गाजली होती.
आसावरी जोशी म्हणाल्या …
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश का केला, असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. मी हा पक्ष का निवडला असा प्रश्न सगळ्यांच्या मनात नक्कीच असेल. मी कलाकार आहे आणि कलाकारांसाठी झटणारा असा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष आता माझ्या नजरेत नाही. म्हाडाच्या सोडतीमध्ये कलाकारांसाठी असलेला कोटा असो किंवा मराठी चित्रपटाला उद्योगा चा दर्जा देण्याची गोष्ट असो किंवा लोककलावंत, इतर कलावंत ज्यांना पेन्शन चालू आहे त्यांचं पेन्शनवाढ करण्याची गोष्ट असो.. कलाकारांचे प्रश्न मांडले जातात आणि समस्यांवर उत्तरं शोधली जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यासाठी झटणारा हा एकच पक्ष आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आलाय, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आलेय की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन,” असं वक्तव्य आसावरी यांनी यावेळी केलं.