मुंबई-जरंडेश्वर सहकारी कारखाना अजित पवारांनी बेकायदा बळकावला असल्याचा आरोप करत,हा कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज साताऱ्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईतील ईडी कार्यालय गाठले. ईडी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी जरंडेश्वर सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली .
दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या सभासदांनीही आपली भूमिका मांडली. 2010 मध्ये या कारखान्याचा लिलाव करून तो बेकायदा बळकावण्यात आला. त्यामुळे या कारखान्याचे सभासद असलेल्या 27 हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी ईडीकडे केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. साताऱ्यातील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बेकायदा ताब्यात घेतला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी घरातील महिला व इतर सदस्यांचा वापर केला. त्यामाध्यमातून 1200 शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून परत घेऊन तो शेतकऱ्यांना सोपवण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना 2010 मध्ये मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीला विकण्यात आला होता. मात्र, कंपनीच्या मुळ किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीत हा कारखाना विकण्यात आला. या व्यवहारामध्ये कायदेशीर बाबींचे पालनही करण्यात आले नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीशी अजित पवारांच्या कुटुंबांचा संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यापुर्वीही ईडीकडेही तक्रार दिली आहे.
.