- पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी*
- धरणांतून पाणी न सोडताही पूर ; कृती आराखडा व नव्याने अहवाल करण्याची मागणी
पुणे :
पुण्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर प्रभाग क्रमांक २ सह शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. शांतीनगर, भारतमाता नगर, टिंगरेनगर, आंबेडकर कॉलनी आदी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. या पूरस्थितीस नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली चुकीची कामे आणि प्रशासनाचा हलगर्जी कारभार जबाबदार असल्याचा आरोप पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे.
धेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अद्याप मुळशी आणि पवना धरणांतून पाणी सोडण्यात आलेले नसतानाही शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळात धरणांतून पाणी सोडावे लागल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
संगमवाडी येथे मुळा आणि मुठा नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाच्या कामांमुळे नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे पाणी नाल्यांमधून बाहेर पडून टिंगरेनगर, आंबेडकर कॉलनी आणि परिसरातील वस्त्यांमध्ये शिरल्याचा दावा धेंडे यांनी केला. तसेच अनेक ठिकाणी नद्यांमध्ये भराव टाकल्यानेही पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला, असे त्यांनी सांगितले.
या समस्येबाबत आपण वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पाहणी करून समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

