नवी दिल्ली– उत्तराखंडमधील उत्तरकाशीत गेल्या रविवारी एक बांधकामाधीन बोगदा ढासळला. या बोगद्यात काम करणारे 36 मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात अजूनही यश आले नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट वर्ल्डकपची फायनल बघण्यासाठी चालले आहे. हे अत्यंत निर्दयी सरकार आहे, अशा शब्दांत आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.
मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले, एकीकडे 40 जिवांना वाचवण्याचे आव्हान असताना दुसरीकडे भाजपचे मंत्री पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात होणारा वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत.
संजय राऊत म्हणाले, हे सरकार अत्यंत निर्दयी आहे. राजकीय स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले आहे. 40 काय 40 हजार लोकं जरी अडकले असते तरी सरकार क्रिकेटचा सामना पाहण्यात आणि प्रचारात दंग झाले असते. सरकारला गरिबांची आठवण फक्त निवडणुकीत येते, त्यांना गरिबांच्या जिवाची पर्वा नाही. त्यांना गरिबांच्या जिवाची तडफड दिसणार नाही. त्यामुळे या सरकारकडून मानवता आणि दया या संदर्भात अपेक्षा करणे चुकीचे आहे.
उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला. त्यामुळे बोगद्यात काम करत असलेले 40 मजूर अडकले आहेत. या दुर्घटनेस 7 दिवस उलटून गेले असून अद्यापही एकाही मजुराला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यात अमेरिकन ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवार सायंकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनही ठप्प झाले आहे.