ज्येष्ठ लेखक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे उद्गारः एमआयटी डब्ल्यूपीयूत बुद्ध पौर्णिमा साजरी
पुणे, दि.२३ मे: भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. त्यांनी संपूर्ण जगासमोर ज्ञानाचे स्वरूप मांडले. त्याच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात आज संपूर्ण जग शांती शोधत आहे. असे उद्गार ज्येष्ठ लेखक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव, प्रा.डॉ. दत्ता दंडगे व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
डॉ. रतनलाल सोनग्रा म्हणाले, बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे. आजच्या काळात संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे. मनुष्य हा भविष्य व भूत काळाचा विचार करतो परंतू बुद्धांनी वर्तमान काळात सुखी राहण्याचे तत्त्व मांडले. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते.
राहुल कराड म्हणाले, बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणेची शिकवण दिली. बुद्धांचे विचारच जीवनाला प्रेरणा देणारे आहेत.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, मौनम सर्वोत्तम साधनम असे जे म्हटले त्यावर सर्वांनी चालावे. आजच्या मानवाला बुद्धिच्या माध्यमातून जगला पाहिजे परंतू तो रिअॅक्शनमध्ये जगतो. व्यक्ती हा श्वास, विश्वास आणि आत्मविश्वासावर जगतो. पृथ्वीला समृद्ध करण्यासाठी बुद्धांचा विचार अमलात आणावा.
डॉ.एस.एन.पठाण यांनी सांगितले भगवान गौतम बुद्ध हे शांतीदूत म्हणून ओळखले जातात व त्यांनीच जगाला शांतीचे तत्त्व सांगितले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.