पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आगामी काळात प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीबद्दल मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी सध्या काही बोलणार नाही. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. मात्र, वैचारिक दृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकाला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयावर सविस्तर मत व्यक्त केले.
सर्वांना विचारून निर्णय घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले जाते. त्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाबाबत मोठे विधान केले आहे. देशातील राजकारणात अनेक राजकीय पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
भाजप, मोदींसोबत जाण्यास नकार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत एनडीए मध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव देखील अजित पवार यांना मिळाले आहे. त्यानंतर शरद पवार देखील भाजप सोबत जातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या मुलाखतीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचणी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या याबाबत आता विविध चर्चा रंगल्या आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
- शरद पवार म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही… वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत.
- शरद पवार म्हणाले की, मी आता काहीही बोलत नाही… सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलू नये. वैचारिकदृष्ट्या, आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत – रणनीती किंवा पुढील पावले यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. आम्हाला त्यांच्याशी (नरेंद्र मोदींशी) जुळवून घेणे, त्यांचे विचार पचणी पडणे कठीण आहे. उद्धव देखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे.
- शरद पवार म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध “अंडरकरंट” जाणवत आहे. राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाला भाजप आणि मोदी आवडत नाहीत. त्यामुळे ते एकत्र येऊ लागले आहेत. देशातील मूड नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत.
- शरद पवार म्हणाले की, 2019 आणि 2024 मध्ये आणखी एक फरक होता. आता अनेक तरुण लोक गेल्या वेळेच्या तुलनेत विरोधी पक्षांशी जुळवून घेत आहेत. त्यामुळे परिस्थिती जनता पक्षासारखी होऊ शकते. 1977 मध्ये विविध पक्ष एकत्र आले. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. आता प्रमाणे तेव्हाही विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यापूर्वी अेक पक्ष विलीन झाले. जनता पक्ष आला. जयप्रकाश नारायण आणि जे.बी. कृपलानी विविध पक्षांच्या खासदारांशी बोलून हे जुळवून आणले.
- शरद पवार म्हणाले की, 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना जास्त जण स्वीकारतात. देसाईंपेक्षा त्यांना त्यांच्याच पक्षात मोठा पाठिंबा आहे. त्यांना समविचारी लोकांना एकत्र आणायचे आहे, असे लोकांनाही वाटते. राहुल यांनी अशा अनेक विषयांवर गंभीरपणे चर्चाही केलीय. मोरारजी देसाई अशा पद्धतीने काम करत नसत. माझे एवढेच म्हणणे आहे की, परिस्थितीची मागणी आहे की आपण एकत्र काम करावे. हीच सर्वसाधारण विचारसरणी आहे. आम्ही निवडून आलो तर स्थिर सरकार दिले पाहिजे.
- शरद पवार म्हणाले की, ज्या लोकांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडला, त्यांना जनता पसंद करत नाहीय. बारामतीमध्ये आम्ही जिंकत आहोत. पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात. मात्र, राजकीयदृष्ट्या त्यांना परत यायचे असेल, तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही.