कर्जत-सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली आहेया अधिवेशनात पुढे बोलताना अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. आम्हाला सातत्याने गाफिल ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही 10-12 जण होतो. देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचा विचार सुरू होता. थेट साहेबांना सांगितले तर काय वाटेल असं वाटल्याने आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावले, असे अजितदादा म्हणाले.
आम्ही सुप्रियाला चर्चेसाठी बोलावले आणि सांगितले लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. ती म्हणाली, ”मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचं ते माझ्यावर सोपवा”. त्यानंतर आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. सरकारमध्ये गेलं पाहिजे. आमदारांच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहे. बहुजन समाज आणि अल्पसंख्यांकाचा विचार झाला पाहिजे. याचा विचार यावेळी आम्ही केला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. दिली.त्यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. त्यांना आमचा निर्णय सांगितला. यावर ते म्हणाले ठीक आहे. बघू काय करायचे ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणला गेलो. आम्ही म्हटलं वेळ जातोय निर्णय घ्या. तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून सांगितलं की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 1 मे रोजी आम्ही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात होतो. नंतर 2 तारखेला पुस्तक प्रकाशन होणार होते अशी माहिती अजित पवारांनी दिली.
शरद पवार यांना आम्ही आमचा निर्णय सांगितला. त्यानंतर शरद पवार म्हणाले मी राजीनामा देतो, सुप्रियाला अध्यक्ष करा. त्यानंतर त्यांनी परत राजीनामा मागे घेतला. धरसोड सुरू होतं. राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला कशाला? असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करायला शरद पवार यांनीच सांगितले, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजितदादा यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी
भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला बोलावलं कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवले म्हणून मी गेलो. मग सातत्यानं असे का करत आहात? असा सवाल देखील अजित पवरांनी केला आहे.
जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार
आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करत आहे. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना न्याय मिळेल. माझ्यासकट नऊ मंत्र्यांनी चार-चार जिल्हे वाटून जबाबदारी घेतली पाहिजे जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार. मी हे बोललोच नाही, मी हे ऐकलंच नाही असे मी बोलत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला दिला आहे.