‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
पुणे ता. २७: व्यापक परंपरा लाभलेला हिंदू धर्म अनादी काळापासून विश्वकल्याण आणि शांतीचा संदेश देत आहे. हिंदू मुळातच सहिष्णू असून काळानुरूप अनेक बदल या धर्माने स्वीकारले आहे. त्यामुळे हिंदू धर्म प्रतिगामी कधीच नव्हता आणि नाही असे मत ‘शिव कैलास’ असवली येथील महायोग आश्रमाचे सर्वेसर्वा ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज यांनी येथे व्यक्त केले.
उद्गार भारत भारततर्फे काल ‘नाद अनाहत’ मासिकाचा प्रकाशन सोहळा उदयनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी क्षेत्र सिद्ध जोगेश्वरी बन येथील महंत शिवगिरी महाराज, सोमनाथ महाराज, वाणिज्य विषयक अभ्यासक डॉ. अनिल कुलकर्णी, प्रकाशनच्या संस्थापिका आसावरी पाटणकर, संपादक सुजीत भोगले, मार्गदर्शक शशांक महाजन यांच्या हस्ते ‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.
यावेळी कुलकर्णी म्हणाले की, धार्मिक ध्रुवीकरणाने भारताचे विभाजन झाले. त्या आधी अनेक परकीय आक्रमणे हिंदू धर्मावर झाली. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हिंदूंना कायम दुय्यम, कमी लेखले गेले. राजकीय वर्चस्वाच्या छुप्या हेतूने काहींनी एकत्र येऊन हिंदू म्हणजे प्रतिगामी, बुरसटलेले, अंधश्रद्धा मानणारे असा समज पसरवण्यास सुरुवात केली. प्रसंगी इतिहासातही छेडछाड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दुर्दैवाने, काही अंशी त्यांचा हेतू साध्य करण्यात त्यांना यशही आले. अशा डाव्या विचारसरणीचा आणि स्वतःला सो कोल्ड पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पूर्वग्रहदूषित विचारांचा पगडा इतका वाढला की, सनातन धर्माच्या प्रचार-प्रसार करणारे वक्ते, साहित्यिक यांना व्यासपीठ मिळणेही बंद झाले. प्रसारमाध्यमातूनही याच विचारसरणीचा प्रभाव वाढू लागला.
ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षात खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळायला सुरुवात झाली. आज धार्मिक ध्रुवीकरण करण्याची कुवत डाव्या विचारसरणीत नसली तरी जाती जातीत फूट पाडून लोकांची मने दुभंगून टाकण्याचा कुटील डाव काही अपप्रवृत्तींकडून रचला जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण हिंदू धर्माला वाहिलेले मासिक सुरू करण्याचे धाडसी पाऊल आसावरी पाटणकर आणि सुजित भोगले यांनी उचलले आहे. यातून सनातन धर्म, इतिहास, संस्कृती, कला याची सर्वांगीण माहिती पुरविणारे दर्जेदार लेख रसिक वाचकांना उपलब्ध होतील, अशी मला खात्री आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
यंत्र, तंत्र, मंत्र याच्या संयोगाने पुढे जाणारे हे युग असून हिंदू धर्माने हे सूत्र स्वीकारले पाहिजे. हिंदू धर्माने कायमच जनकल्याणाचा संदेश दिला आहे. विदेशी राष्ट्रांमध्ये आपल्या धर्माचे आकर्षण वाढत असताना आपल्या राष्ट्रात मात्र हिंदू धर्माविषयी द्वेष पसरवला जाणे ही दुर्दैवी बाब आहे. अशा परिस्थितीत उद्गार भारतने ‘नाद अनाहत’ची सुरुवात करून शिवधनुष्य हाती घेतला आहे. यात त्यांना यश येऊ दे. संयमी आणि उत्कृष्ट लेखातून समाजाला प्रकाशाकडे नेणारे हे मासिक ठरू दे. हा अंक देशभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध होऊ दे. अशा शब्दात महंत शिवगिरी महाराज यांनी मासिकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मराठीतील धर्मयुग म्हणजे ‘नाद अनाहत ‘कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांना वाहिलेले ‘धर्मयुग’ हे साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय होते. हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर या विषयांना वाहून घेतलेले एकही साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक छापले जात नव्हते. ‘नाद अनाहत’ हे मासिक धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म या विषयांनाच समर्पित असेल. या मासिकातून दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘नाद अनाहत’ रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आसावरी पाटणकर, सुजीत भोगले यांनी व्यक्त केला आहे.