गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या ‘शिवसूर्य’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा
पुणे : भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही भाग्यवान आहे, कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे लाभले आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एक भाग आहोत, हे भान ठेवून प्रत्येकाने जगले पाहिजे. स्वराज्य त्यांनी दिले, परंतु आता हे स्वराज्य सुराज्य करण्यासाठी पुढील पिढी शिवजयंतीत कशी सामील होईल याची तयारी करू. हाच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरा मानाचा मुजरा असेल, असे मत शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी व्यक्त केले.
गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या वतीने शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे करण्यात आले. यावेळी हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, अॅड. प्रताप परदेशी, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर,रवींद्र भन्साळी,संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे,विजय चौधरी उपस्थित होते. यावेळी प्रतापराव गुजर, येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारताला दिलेले वरदान म्हणजे आरमार याविषयी त्यांनी माहिती दिली.
सौरभ करडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य दिले. परंतु हल्ली हिंदवी स्वराज्यातील हिंदवी हा शब्द काढला जातो. औरंगजेब, शहाजान, अकबर यांच्या अनेक पिढ्या गेल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर कोणीही हिंदूत्व या मातीपासून वेगळे करू शकले नाही, असे ही त्यांनी सांगितले.
अशोक गुंदेचा म्हणाले, आज प्रत्येकजण पैसे कमविण्याचे मागे धावत आहे. परंतु त्यामुळे त्याची समाजाशी नाळ तुटत चालली आहे. माणसाला समाजाशी जोडून ठेवण्याचे काम सामाजिक संस्था आणि मंडळे करतात, असेही त्यांनी सांगितले.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी ती अंगावर घेतल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आज तरुणांना कष्टाची सवय नाही. त्यासाठी चांगला मित्र, चांगली सोबत असणे गरजेचे आहे. धर्म टिकला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज घडेल आणि समाज घडला तर राष्ट्र टिकेल असेही त्यांनी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येते. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.