आबा बागुलांचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल
पुणे-वृत्तपत्रे आणि टीव्ही यासह विविध ठिकाणी होर्डिंग बाजी करत भाजपच्या जाहिरातींच्या अतिमाऱ्यामुळे लोक वैतागले असताना आता कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना छेडले आहे. आणि शहराच्या विद्रुपीकरणावर विक्रमी कारवाईचे धारिष्ट्य दाखवाल काय ?शहराचे सौंदर्य राखण्याची गॅरंटी कोण घेणार? असे सवाल केले आहेत.जाल तिथे मोदींचा चेहरा दिसेल अशी जाहिरातबाजी आणि पर्यटनाची पुरपूर हौस भागवणारी कारकीर्द पंतप्रधान मोदी यांची दिसून आली आहे या पार्श्वभूमीवर आता बागुलांनी आणि एकूणच विरोधकांनी शहरभरातील रस्तोरस्ती भाजप भिंतीवर जाहिराती करून त्या खराब करत असल्याकडे आणि हे सारे परवान्याशिवाय चालू असल्याकडे लक्ष वेधले आहे.
या संदर्भात बागुल यांनी असे म्हटले आहे कि,’ एकीकडे शहराचे सौंदर्य जपण्याचे आवाहन होत असताना दुसरीकडे फ्लेक्स,बॅनर्स आणि आता एका राजकीय पक्षाकडून भिंती रंगविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही प्रशासनाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.वास्तविक शहराचे सौंदर्य जपण्याची ‘गॅरंटी’ दिली पाहिजे ;पण शहराचे विद्रुपीकरण करण्यास प्रशासनच एकप्रकारे खतपाणी घालत आहे.त्यामुळे उद्या हेच विद्रुपीकरण हटविण्यासाठी करदात्या पुणेकरांच्या रकमेचाच चुराडा होणार आहे.मग प्रश्न असा बेकायदेशीररीत्या बॅनर्स, भिंती रंगविणारे नामानिराळे होतील आणि त्यांनी केलेले विद्रूपीकरण हटविताना जनतेचा पैसा खर्च करणे योग्य कि वेळीच असे बॅनर्स व भिंती रंगविण्याचे उद्योग रोखणे,अशा प्रकाराला अटकाव घालणे? याचे उत्तर आपण पुणेकरांना दिले पाहिजे. त्यामुळे आपणास विनंती आहे की ,तातडीने एका राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी भिंती रंगविण्याचा प्रकार तात्काळ रोखून संबंधितांवर कारवाई करावी.