अकोला-आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला.आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकरांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. जरांगेंचा बोलविता धनी कोण विचारणाऱ्या राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे.
छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.