मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर झालं आहे.
अनेक दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरु आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा विधान परिषदेत रिक्त झाली आहे.
भाजपकडून प्रज्ञा सातव यांना त्याच रिक्त झालेल्या जागेवर जी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 9 जागांपैकी 5 जागांवर विजय मिळवण्याचं संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे 5 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते. अनेकांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. अनेकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले जात होते. या विषयावर महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काही नावे निश्चित करण्यात आली होती. ही सर्व नावे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली होती. त्यापैकी सहा नावे भाजपच्या हायकमांडने मान्य केली आहेत. या सर्व उमेदवारांची नावे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.


