पुणे : पुण्यातल्या खराडी भागात एक मोठी घटना घडली आहे. रात्रपाळीत काम करत असताना ‘आधी कोण झोपणार?’ या साध्या कारणावरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये एवढा मोठा वाद झाला की त्यातून थेट हत्येची घटना घडली. पांडुरंग खारवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुदर्शन काळे (वय २२, रा. खराडी) हे दोघे एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. दि. १२ एप्रिल रोजी रविवारी रात्री दोघांची एकत्र रात्रपाळी होती. काम करताना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी आधीच ठरवलं होतं की रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत आळीपाळीने तीन-तीन तास झोप घ्यायची.’आधी कोण झोपणार?’
पण रात्री उशिरा ‘आधी कोण झोपणार?’ यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा साधा वाद होता, पण हळूहळू तो चांगलाच पेटला. दोघेही एकमेकांवर ओरडायला लागले. राग अनावर झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. संतापाच्या भरात सुदर्शन काळे याने आपल्या गळ्यातील गमजा काढला आणि तोच गमजा खारवणे यांच्या गळ्याला घट्ट आवळला. काही क्षणातच खारवणे खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. हा प्रकार पाहून काळे घाबरला.घाबरलेल्या अवस्थेत त्याने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खारवणे यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छोट्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव गेला, यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुदर्शन काळे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान छोट्या गोष्टींच्या रागातून असे विकृत कृत्य होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.







