पुणे- आपल्या भागात असंख्य अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामे आहेत, अनेकांनी फ्रंट,साईड मार्जिन मध्ये,पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामे केलीत.५ कुटुंबांची घरे होती तिथे ५० हून अधिका सदनिकांच्या इमारती उभ्या राहिल्या असे असताना या साऱ्या बड्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून नियमात असलेलीच बांधकामे ठेवावीत,नियमबाह्य तातडीने काढून टाकावीत असा आग्रह धरण्या ऐवजी प्रभाग क्रमांक १० मधील अंडा-भुर्जी गाड्या,टपऱ्या,हातगाडी वाले यांना नगरसेवक किरण दगडे पाटलांनी का लक्ष्य करावे ? असा सवाल आता याभागातील पथारीवाले, टपरीवाले आणि हातगाडीवाले करू लागलेत. एक तर काही राजकीय आशीर्वाद असलेली मंडळे आहेत त्यांचे काही म्होरके देखील या व्यावसायिकांना त्रास देत असतात एवढेच काय इमारतीतील दुकानदार आपल्या दुकानापुढे पथारी,टपरी हातगाडी लावायची असेल तर अशा हातावरचे पोट असणाऱ्यांना भाडे मागतात.पुन्हा अतिक्रमण वाले आहेतच अशा स्थितीत पोट भरायला रस्त्यावर आलेली हि मंडळी काकुळतीला आलीत आणि एक मोठ्ठा चित्रपट निर्माता असलेल्या आणि बडे बडे दिग्दर्शक,स्टार घडवलेल्या दगडे पाटलांनी अशा सामान्य लोकांच्या पोटावर पाय द्यावे हे काहीना पटेनासे झालेय तर रस्त्यावर अतिक्रमणे नको,त्यामुळे खूप त्रास होतो अशी भूमिका असलेले काही जन त्यांच्या या कृतीचे स्वागत देखील करत आहेत.

दगडे पाटलांनी आपले असे म्हणणे समाज माध्यमातून मांडले आहे कि ,प्रभाग क्रमांक १० मधील वाढते अतिक्रमण,अनधिकृत तसेच आर.एम.सी. प्लांट यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय येथे तीव्र आंदोलन करावे लागले. या आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात अनधिकृत टपऱ्या व हातगाडे आम्ही आणले होते.प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाला कुलूप लावून कामकाज ठप्प करण्यात येईल,असा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे.सहाय्यक आयुक्त जाधव यांनी तात्काळ दखल घेत बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली असून, पुढील ७ दिवसांत अतिक्रमण,अनधिकृत टपऱ्या,हातगाडे, अंडा-भुर्जी गाड्या तसेच आर.एम.सी.प्लांट हटविण्याची कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले आहे.नागरिकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याची भावना प्रभागात व्यक्त होत आहे असाही दावा दगडे पाटलांनी केला आहे.

