पुणे- माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातून निवडणूक लढणार नाहीत असे संकेत आज पुण्यातील कॉंग्रेस भवनात मिळत असताना आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी भाजपातून ऑफर येते आहे या बातमीची कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष दखल घेतली आहे,ज्यांना कोणाला भाजपात जायचे असेल त्यांनी खुशाल जावे,असे सांगतांना वरिष्ठ नेत्यांनी लोकसभे साठी उमेदवार देताना दबावतंत्र अगर वशिलेबाजी चालणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या सोहळ्या संदर्भात आपल्या पक्षातील ज्यांना कुणाला जायचे असेल त्यांनी जावे असे सांगितले होते.मात्र राजकीय स्वरूपाच्या दृष्टीने जर कुणाला भाजपमध्ये जाऊन निवडणूक खरोखर लढवायची असेल त्यांनी जरूर जावे त्यांना कॉंग्रेसचाच उमेदवार पराभूत करेल यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याने आता कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या वर्तुळात मोठी हलचल उडणार आहे.प्रियांका गांधी यांनी पुण्यातील निवडणुकीसंदर्भात काही मान्यवरांशी चर्चा केल्याचे देखील वृत्त आहे. स्वतः प्रियांका गांधी पुण्यासाठी वेळ देऊ शकतात,बारामती आणि पुणे तसेच मुंबई साठी निवडणुकीच्या काळात आम जनतेत त्यांच्या संवाद फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल असाही व्होरा सूत्रांचा आहे. स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बोलूनच अशा प्रकारचा त्यांचा दौरा ठरविण्यात यावा अशीही व्यूह रचना होते आहे.
दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पश्चिम विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी,आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश चेन्नीथला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी करण्याच्या मुद्यावर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यांना मविआत घेण्याच्या मुद्यावर काँग्रेसची परवानगी आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.सध्याचे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. ते महागाई व बेरोजगारीच्या प्रश्नांवर बोलत नाही. पण आम्ही इंडिया आघाडी देशभरात सर्वसामान्यांशी निगडित प्रश्नांवर आवाज उठवत आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश निश्चित मिळेल, असे ते म्हणाले.सार्वत्रिक निवडणुकीत इंडिया आघाडीतील कोणता घटकपक्ष किती जागा लढवणार? याविषयी सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच घोषणा केली जाईल.पण महाराष्ट्रात आमच्या सर्व 48 जागा निवडून येतील.कारण,सध्याचे सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही. ते ईडी व सीबीआयचे सरकार आहे, असे रमेश चेन्नीथला यावेळी बोलताना म्हणाले.