मुंबई-मुख्यमंत्री-दोन उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाडीतील दाटीवाटीत बसलेला व्हिडिओ समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओवर विरोधकांकडून बोचरी टीका केली गेली. याच व्हायरल व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तर व्हिडिओ व्हायरल करणारा मूर्ख आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला विभागातर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भव्य नारीशक्ती निर्धार मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी व्हायरल व्हिडिओवर विचारला असता अजित पवार चांगलेच खवळले. त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
व्हिडीओ व्हायरल करणारा मूर्ख
अजित पवार म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोण कुणाच्या गाडीत बसणार, कुठे बसणार हे चेक होत असतं. पुढे गाडीचा चालक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मागे मी स्वत: आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बसणार होतो. पण ताफा एकदम पुढे गेल्याने आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना बसायला गाडी नसल्याने मीच त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने जाऊ. शएवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत, अशी सारवासारव त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले की, जे व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्यांची मला कीव करावीशी वाटते. विकासाचं बोलुयात ना आपण… गाडीत किती बसले, कोण बसले… अरे दाटीवाटीचा त्रास जे गाडीत बसले त्यांना होईल ना… तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी संतापून विरोधकांना विचारला.
नको त्या विषयांवर बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. पण गाडीत जागा असताना देखील तिसऱ्या व्यक्तीला आम्ही गाडीत घेत नाही. तो दार उघडा म्हणतोय पण आम्ही दार उघडत नाही, असं जर झालं असतं तर नक्की बोलण्याचा अधिकार होता. परंतु असं काहीही झालं नाही. विरोधकांनी उगीच कोणताही विषय मोठा करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
एकाच सीटवर चार जणांना बसण्याची वेळ
रोहित पवार म्हणाले की, पूर्वी काही नेत्यांचा एकेकाळी रुबाब असायचा. पण आता गाडीच्या एकाच सीटवर चार बड्या नेत्यांना बसण्याची वेळ आली आहे. आणि दिल्लीमध्ये आपण देखील चर्चा झालेली नाही. केवळ आदेश दिलेले होते. तुम्ही चार सीट लढायचे, तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सर्व भाजप लढवणार कारण भाजपमध्ये हुकूमशाही सुरू आहे. पण आमच्या महाविकास आघाडीत लोकशाही आहे.