अजित पवारांना घोटाळ्यातून वाचविण्याचे काम फडणवीस अन् पंतप्रधान मोदी करताय-शालिनी पाटील यांचा आरोप
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे.त्याचबरोबर अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून गायब होईल असाही दावा शालिनी पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, शालिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले आहेत. ज्यात, पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शालिनी पाटील म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे मूळ नाव जनसंघ आहे. मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रातील काही नेते माझे ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली आहे.
शालिनी पाटील म्हणाल्या की, अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल. शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला. अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे. शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचा आहे. उद्या मला देखील मी 92 वर्षाची असल्याने वेडे ठरवतील, असा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.
शालिनी पाटील म्हणाल्या की, अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली. अँटी करप्शनचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना सांगायचे आहे, मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात. यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते. मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.