मुंबई-एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीचा अंत झाला म्हणत प्रतिक्रिया दिली होती.
यावेळी शिंदे यांच्यावर राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ”एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा. त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होते? बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचार पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. लोकांना स्विकारायचे असेल तर स्विकारतात नाहीतर दूर करतात”, असे राऊतांनी म्हंटले आहे.
तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या टोळ्यांचे पुरस्कर्ते आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेला गुजरातच्या लॉबीद्वारे इतिहासजमा करण्याची योजना आहे. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे इतिहासात गाडले गेले. आम्हालाही सुद्धा मराठी असल्याचा अभिमान आहे. दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही”, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. निकालानंतर लोकांच्या मनात चीड आहे. मॅच फिक्सिंग करुन निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही. शिंदे गटाची वकीली करावी अशा प्रकारे निकालाचे वाचन सुरु होते. नार्वेकरांनी नोंदवलेले आक्षेप पूर्णपणे खोटे आहेत. गोगावलेंची निवड चुकीची कोर्टाने सांगितले होते. कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले ”, असे राऊत म्हणाले.