काळाचौकी येथील रेशनिंग दुकानात पात्र लाभार्थींना केले वितरण
मुंबई, दि. २० ऑक्टोबर- दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणा-या आनंदाचा शिधा या चार वस्तूंच्या वितरणाचा शुभांरभ आज अन्न, नागरी व पुरवठा मत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. काळाचौकी, घोडपदेव येथील रेशनिंग दुकानातील पात्र शिधापत्रिकाधारकांना चार वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, राज्यातील गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीकोनातून या सरकारने पहिल्यांदाच हे पाऊल उचललं आणि हे पाऊल उचलत असताना चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात 100 रुपयांमध्ये आपल्या सर्वांना मिळाले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारने हे पाऊल उचललं आहे. आज महाराष्ट्रातील सर्व रेशनिंग दुकांनावर या ठिकाणी चारही वस्तू पोहचलेल्या आहेत. असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांना येणाऱ्या काळामध्ये प्राधान्य कुटूंबातील शिधावाटप पत्रिकाधारकांना अंत्योदय अन्न योजनेतील जवळ जवळ 1 कोटी 62 लाख पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.